परागंदा असणार्या व्यक्तीची वारस नोंद
काही वेळेस एखादी
व्यक्ती अनेक वर्ष मिळून येत नाही किंवा तिची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळत
नाही आणि अशा व्यक्तीची पत्नी किंवा अन्य वारस तलाठी यांच्याकडे वारस नोंदीसाठी
अर्ज करतात.
परंतु अशा वेळेस
तलाठी यांना थेट वारस नोंद नोंदविता येणार नाही, त्यासाठी दिवाणी न्यायालयातर्फे अशी व्यक्ती मयत आहे असे प्रमाणपत्र आणि त्यासोबतच दिवाणी न्यायालयाने दिलेला वारस दाखला अत्यावश्यक असतो.
अनेक वर्षे परागंदा व्यक्ती मृत घोषित करण्याची तरतूद भारतीय
साक्षीपुरावा अधिनियम,
१८७२
(The Indian Evidence Act) कलम १०७ व कलम १०८ अन्वये आहे.
¨कलम १०७:
ज्यावेळी एखादी व्यक्ती
हयात आहे की मृत आहे असा प्रश्न निर्माण होतो व मागील तीस वर्षांच्या अवधीत
केव्हातरी तो हयात होता हे दाखवून देण्यात येते तेव्हा तो मृत आहे हे शाबीत
करण्याची जबाबदारी तसे म्हणणाऱ्या व्यक्तीवर असते.
¨कलम १०८:
परंतु जेव्हा एखादी व्यक्ती हयात आहे की
मृत आहे हा प्रश्न असतो व जर तो हयात असता तर स्वाभाविकपणे ज्यांना त्याचा
ठावठिकाणा कळला असता त्यांना सात वर्षे त्याच्याबद्दल काही बातमी कळलेली नसते
तेव्हा,
तो हयात आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी तसे म्हणणाऱ्या व्यक्तीकडे
संक्रामित होते.
भारतीय साक्षीपुरावा अधिनियमान्वये शाबितीची जबाबदारी:
¨कलम १०१:
जो कोणी स्वतः प्रपादन केलेल्या तथ्यांच्या अस्तित्वावर अवलंबून असलेल्या
कोणत्याही वैध हक्काबाबत किंवा दायित्वाबाबत
न्यायनिर्णय देण्यास कोणत्याही न्यायालयाला आवाहन करील,
त्याने ती तध्ये
अस्तित्वात असल्याचे शाबीत केले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही तथ्यांचे
अस्तित्व शाबीत करण्यास बांधलेली असते तेव्हा, शाबितीची
जबाबदारी त्या व्यक्तीवर असते.
¨कलम १०३: कोणत्याही विशिष्ट तथ्यासंबंधीच्या शाबितीची जबाबदारी
एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर राहील असा
कोणत्याही कायद्याने उपबंध केलेला नसेल तर, जी व्यक्ती न्यायालयाला त्या तथ्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याचे
आवाहन करील तिच्यावर त्या तथ्याच्या शाबितीची जबाबदारी राहील.
¨कलम १०४: जे कोणतेही तथ्य कोणत्याही व्यक्तीला अन्य एखाद्या
तथ्याबद्दल पुरावा देणे शक्य व्हावे म्हणून शाबीत करण्याची जरूरी असते ते शाबीत
करण्याची जबाबदारी असा पुरावा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीवर असते.
उपरोक्त तरतुदीनुसार
दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर, अशा सात वर्षांपेक्षा अधिक काळ परागंदा असलेल्या व्यक्तीला मृत घोषित करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे. अशा प्रकरणात, दिवाणी न्यायालय
अशा परागंदा व्यक्तीस शोधण्यासाठी काय काय प्रयत्न करण्यात आले, (उदाहरणार्थ पोलिसांकडे तक्रार, वर्तमानपत्रात जाहिरात इत्यादी) याची सविस्तर चौकशी
करून सदर परागंदा व्यक्तीस मयत घोषित करते आणि त्याबाबत वारस दाखला
निर्गमित करते.
असा वारस दाखला
संबंधित वारसदाराने सादर केल्यास आवश्यकतेप्रमाणे त्याची वारस नोंद
घेण्यात येते.
=
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला परागंदा असणार्या व्यक्तीची वारस नोंद. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link
Telegram Channel Link धन्यवाद !