आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
المشاركات

महसूल शब्दावली - 9

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

४२६. हलकरी: गावातील गुरांसाठी पाण्याचे हौद भरणारे ग्रामसेवक

(Halkaris: village servants who fill the water troughs for the village cattle.)

 २७. मिरास आणि उपरी पद्धत: 'मिरास' 'उपरी' हे दोन्ही अरबी भाषेतील शब्द आहेत.

मिरास पद्धत:  मेलेल्या मनुष्याची जी मिळकत त्याच्या वारसाला प्राप्त होते तिला अरबी भाषेत "मिरास" म्हणतात. सन १६०७ ते १६२६ दरम्यान निजामशाहीमधील सुप्रसिद्ध मुत्सद्दी, चांदबिबीचा विश्वासू नोकर, औरंगाबाद शहर वसविणारा मलिकंबर याने शेतवार पाहणी व मोजणी करून प्रतवारी बसवली आणि जमिनीच्या उत्पन्नाप्रमाणे काही हिस्सा वसूल घेण्याचा ठराव गावाशी करून तो वसूल करण्‍याची जबाबदारी पाटलावर टाकली. कुणब्यांना मिरासपत्रे देऊन म्हणजे जमिनीचे मालक बनवून त्यांना जमिनीच्या खरेदी- विक्रीचे हक्क दिले आणि पाटील, कुलकर्णी व इतर ग्रामाधिकारी आणि बलुतदार यांची वतने मिरास म्हणजे वंशपरंपरेची करून दिली.

मिरास या शब्दाचा अर्थ संपूर्ण मालकी असा आहे. या पद्धतीत जमीन मिरासदाच्‍या संपूर्ण मालकीची असते तसेच या जमिनीचा वंशपरंपरेने उपभोग घेता येतो. अशी जमीन हस्तांतरणीय असते. या हस्तांतरणासाठी होणार्‍या दस्तऐवजावर गावच्या कुलकर्णी, देशपांडे या ग्राम अधिकार्‍यांची साक्ष असणे आवश्यक होते. मिरासदाराचा जमिनीवरील हक्क कधीही संपुष्टात येत नसे. मिरासदार गाव सोडून निघून गेले तर त्यांची जमीन इतर कोणीही कसत असे मिरासदार पुन्हा गावात आल्यावर त्‍यांना ती जमीन परत मिळण्याचा हक्क असे. गावच्या कोणत्याही सार्वजनिक समारंभात, जत्रेत, सणासुदीला मिरासदारांना प्रथम मान मिळत असे. त्यांना जमीनधारणेबद्दल शेतसारा भरावा लागत होता. मिरासी जमीनीवरील सारा सरकारला वाढविता येत नसे परंतु अशा जमिनीत उत्‍पादन (पेर) झाले किंवा नाही झाले तरी सरकारला सारा देणे अनिवार्य होते. सारा येत असे तोपर्यंत सरकारला मिरासदाराकडून जमीन काढून घेता येत नव्‍हती. यदाकदाचित सारा थकला तरी देखील मिरासदार तीस वर्षांपेक्षा जास्‍त काळ  परागंदा झाल्याशिवाय मिरास जमीन खालसा करण्याचा सरकारला हक्क नव्हता.

  उपरी पद्धत: उपरी या शब्दाचा अर्थ भाड्याची/स्वतःची नसलेली, दुसर्‍याची असा आहे. मिरासीखेरीज जी लागवडीयोग्‍य जमीन सरकारच्या वहिवाटीला असे तिला खालसा म्हणत. खालसा किंवा सरकारी जमीन सरकार मन मानेल त्याला काही मुदतीपर्यंत कौलाने (लिलावाने) देण्‍यात येत असे. कौलाने जमीन वहिवाटणार्‍याला उपरी म्हणत. (Uparis-Upari is a mere tenant at will.)

 उपरी पद्धतीत सरकारी जमीन वार्षिक हप्त्याने म्हणजे भाडेपट्‍ट्‍याने, पीक घेण्यासाठी कुळे घेत असत व त्याचा उदरनिर्वाह या शेतजमिनीच्या उत्पन्नावर होत होता. ही जमीन धारणा कायम पद्धतीची नव्हती. कुळाची सर्वस्वी मालकी जमिनीवर नव्हती, तसेच ह्या जमिनी त्यांना हस्तांतरण करता येत नसत. तसेच कुळांचे वारस वारसा हक्काने कूळ होत नव्हते. उपरी पद्धतीने शेती करणाऱ्यांचे सामाजिक स्थान दुय्यम समजले जाई. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, याचा विचार उपरी पद्धतीची कुळे करत होती. जमिनीमध्ये याशिवाय त्यांना कोणताही हक्क नव्हता. याची जमीन महसूल आकारणी होत होती; परंतु त्याचा दर मिरासदारी पद्धतीपेक्षा कमी होता. जमीनधारणा काळ संपल्यानंतर ही कुळे इतर ठिकाणी जाण्यास मुक्त होती.

मिरासदारांप्रमाणे उपऱ्यांचा जमिनीवर निरंतरचा असा हक्क नसे. ते सरकारकडून दरवर्षी  कौलाने अगर मुदतीच्या पट्ट्याने परवडेल ती पड जमीन वहिवाटीस घेत असत आणि पेरल्या जमिनीपुरती पट्टी (सारा) देत. जमिनीवर त्यांचा हक्क इतकाच की, त्यांना कौलाच्या मुदतीत तिची वहिवाट (लागण) करता येई. कौलाची मुदत संपताच सरकारला उपरी जमीन वाटेल त्याला देता येत असे आणि त्‍यावरील पट्टी पण वाढवता येत असे. ब्रिटीश राज्यात रयतवारी पद्धत सुरू झाल्‍यानंतर मिरासी व उपरी हा भेद संपुष्‍टात आला.

 

४२८. दरोबस्‍त: सर्वसाधारणपणे हा शब्‍द खरेदी-विक्री दस्‍तऐवजात वापरला जातो. याचा अर्थ, मिळकतीमध्‍ये कोणताही हक्‍क राखून न ठेवता केलेला व्‍यवहार असा आहे.

 

४२९. इनामाचे मूळ सात प्रकार:

इनामाचे खालीलप्रमाणे सात प्रकार होते.

(१)  राजकीय इनाम (Political Inam)

(अ) करार/तह असलेला सरंजाम इनाम (Treaty Saranjam Inam)

(ब) करार नसलेला सरंजाम इनाम (Non-treaty Saranjam Inam)

(क) इतर राजकीय कार्यकाळ इनाम (Other Political Tenure)

(२) वैयक्तिक इनाम (Personal Inam)

(३) देवस्‍थान इनाम (Devasthan Inam)

(४) गुजराथ मधील काही जिल्‍ह्‍यांतील जिल्‍हा आणि ग्राम अधिकारी यांचे असेवा वतन (Non-Service Watans of District and Village Officers in ….)

(५) इतर जिल्‍ह्‍यांतील जिल्‍हा आणि ग्राम अधिकारी यांचे असेवा वतन (Non-Service Watans of District and Village Officers in other Districts)

(६) ग्राम अधिकारी व नोकर यांचे सेवा वतन (Service watans of Village Officers and servants)

(अ) शासन उपयोगी सेवा वतन (watans Useful to Government)

(ब) समाज उपयोगी सेवा वतन (watans Useful to Community)

(७) स्‍थानिक किंवा पालिका अथवा इतर निधीमधून बांधकाम करण्‍यासारख्‍या महसूल मुक्‍त जागा. (Revenue free sites for the construction at the cost of local, municipal or other funds)

 

उपरोक्‍त (१) ते (३) हे नामाचे तर (४) ते (६) हे वतनाचे प्रकार आहेत.

 

४३०. पाटील: पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द प्रचलीत झाला. गावचा कारभार करण्यासाठी एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापड) वर लिहून तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत असे. या नळकांड्याला ‘पट्टकील’ म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर होती त्‍यामुळे तो एकप्रकारे गावचा राजाच बनला. गावकरी व बलुतेदार आपल्या सेवा पाटलाला मोफत देत असत. त्याच्या शब्दाला किंमत होती.

कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी किंवा अगेवान म्हणतात.

पुढे काम वाढल्याने पाटलाची पोलिस पाटील आणि मुलकी पाटील अशी दोन पदे निर्माण झाली. गावातील सर्वच कार्यक्रमात, समारंभात पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी (जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) कुळवाडी यांच्यासह बारा बलुतेदार होते. आपल्या परगण्यात वसूल आणि शांतता अशा दोहोंची जबाबदारी पाटलांवर होती. शिवाय राजाला गरज पडल्यास त्‍याला सैन्‍यासोबत स्वारीवर जावे लागे.

 

४३१. चौगुला: प्राचीन ग्रामसंस्थेतील गावाची व्यवस्था ठेवण्याच्या कामी पाटलास मदत करणारा एक वतनदार अधिकारी. त्याचा दर्जा पाटलाच्या खालोखाल असे.

गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक सनदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत (गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत इनामला जहागिर हा शब्‍द प्रचलीत झाला.

चौगुला हा पाटलाचा तैनाती किंवा हुजऱ्या होय. पाटील किंवा त्याचा मंत्री ह्यांच्या सांगण्यावरून जमातीस आमंत्रण करणे, जातगंगेपुढे अपराध्यास धरून आणणे, पंचायत जमल्यावर पाटलापुढे कंबर बांधून उभे राहणे, पाटलाला प्रथम टिळा अंबर लावणे व विडा देणे, पाटलापुढे सर्व स्वयंपाकाची भांडी मांडणे व त्याचा हुकूम झाल्यावर जातीला जेवण्यास बसण्याला सांगणे इत्यादी कामे चौगुल्याची असत.

हा साधारणतः कुणबी असे; परंतु कोणाही वतनदारास पूर्वी आपल्या वतनाचा भाग दुसऱ्यास देण्याचा किंवा विकण्याचा हक्क असल्यामुळे वाणी, मराठा, ब्राम्हण, लिंगायत वगैरे जातींतही चौगुला वतनाची परंपरा आढळते. गावाच्या एकंदर जमिनीचा पंचविसावा हिस्सा पाटील−कुलकर्णी व चौगुले यांना इनाम म्हणून साऱ्यावाचून देण्याची वहिवाट होती. याशिवाय त्यांना दुसरेही हक्क असत. गावची कोठारे, गुदामे यांची व्यवस्था त्याच्याकडे असे. चौधरी व चौगुले हे साधारणतः एकाच दर्जाचे वतन होते.

 

४३२. कुळवाडी: अनेक पिढ्‍यांपासून कुळ वारसाने आलेली जमीन जो कसत असे त्याला कुळवाडी म्हणत आणि या कुळवाडी मध्ये ९६ कुळे अस्तिवात होती. यातील ज्या कुळाचे जे बलुतेदार, आलुतेदार होते ते त्या कुळासाठी त्यांची सेवा प्रदान करत होते कारण संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर म्हणजेच पर्यायाने कुळवाडी लोकांच्या कुळांच्या आधारावर चालत होती. पुढे मुस्लिम आणि ब्रिटिश राजवटीत या कुळवड्याच्‍या जमिनी देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी आणि सावकार यांनी हस्‍तगत केल्‍या आणि गावच्या मोठ्या जमिनीचे स्वतःच मालक बनले आणि कुळांना जमिनी फक्त कसण्यासाठी दिल्या. त्यामुळे कुळवाडी स्वतःच्या जमिनीचेच नामधारी मालक बनले.

 

४३३. कुलकर्णी: पाटील स्मरणाचा कितीही योग्‍य असला तरी त्याची गावकीची कामे लिहिण्यावाचून चोख होणे कठीण होते. म्‍हणून त्याला लेखक, मदतनीस दिला गेला. या मदतनिसाला स्थलपरत्वे पटवारी, कुलकर्णी किंवा पांड्या म्हणतात. 'नाव लिहिणे' हा एक पूर्वी महत्‍वाचा हक्क होता. गावचा हिशेब लिहिणारा तो कुलकर्णी. द्राविडी भाषेत शेतकऱ्यालाकुल" व कुलकर्ण्यालाकरणंम्हणतात. पांड्या हा पंडित शब्दाचा अपभ्रंश आहे. कुलकर्णी हा पाटलाचा हिशेबनीस होता. बहुतेक कुलकर्णी ब्राह्मण, काही प्रभू व क्वचित मराठे, लिंगावत व मुसलमान होते. पाटिलकीच्या खालोखाल कुलकर्णीला महत्त्व होते.  कुलकर्णी गावच्या दप्तरचे सर्व काम करी. शिवाराचे कमाल क्षेत्र, आकार व वर्णन ह्यांचा आकारबंद, शेतवारपत्रक, लावणीपत्रक, पडपत्रक, सरकारी देण्याचे असामीवर बसूल बाकीपत्रक व त्याची बाबनिहाय फाळणी आणि जमाखर्च, गुरांची व माणसांची गिणती वगैरे मुलकी कागदपत्र, दिवाणी कामातील पंचायतीचे सारांश व फैसलनामे, फौजदारी कामाचे कागद वगैरे लेखी कामे कुलकर्णी तयार करीत असे. याखेरीज गावकऱ्यांची पत्रे, देण्याघेण्याचे दस्तऐवज, पावत्या व त्यांचे सावकारी सरकारी देण्याचे जमाखर्च, हे कामही तो करीत असे.

कुळ म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती. त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. पाटलाप्रमाणे यांनासुध्‍दा गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत असे. कुलकर्णीच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले. 

 

४३४. गुरव: हा बारा बलुतेदारांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार आहे. गुरव देवळात देवाची पूजा करायचे आणि घरोघरी बेल-पत्री वगैरे पोहोचवायचे. गुरव समाज हा शैव समाज आहे. भगवान शंकराची भक्ती करणारे म्हणजे शैव. आजही गावागावात गुरव समाज मंदिरामध्ये पूजा अर्चना करताना दिसतात. कारण त्यांच्याकडे हे काम पारंपरिक रित्या चालत आलेले आहे.

संत काशीबा गुरव हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले. संत सावता माळी यांचे ते समकालीन होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आहेत. भगवान शंकरांच्या पूजेचा मान शैव लोकाना असायचा तेच आजचे गुरव. मंदिरातील पूजा अर्चना गुरव समाज करत असल्याने गावातून त्यांना धान्य किंवा काही वार्षिक मानधन अस दिले जात असे.

 

४३५. जोशी: हे नाव संस्‍कृत शब्द ज्योतिष पासून आले असावे. पूजा-अर्चा करणे आणि भाकित वर्तवणे हे यांचे काम असे. त्यातून ग्रामजोशी, कुडमुडे जोशी हे प्रकार आले. जोशी हे  महाराष्ट्राच्या ग्रामसंस्थेतील एक वतनदार समाज आहे, त्यांचा उल्लेख ‘ग्राम जोशी’, ‘कुडमुडे जोशी’, ‘गिडबिडकी’ इ. नावांनी करण्यात येतो आणि या नावांप्रमाणे त्यांच्या व्यवसायातही फरक आढळतो. यांची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांत असून पूर्वी जोशी हे भिक्षेकरी होते. मराठे, धनगर, माळी इ. जातींचा यात भरणा असे. जोशांचे ‘खास जोशी’ व ‘अकरमासे जोशी’ असे दोन पोटभेद असून त्यांच्यात रोटीव्यवहार होता, पण वेटीव्यवहार होत नसे. त्यांच्या सर्व चालीरीती मराठ्यांप्रमाणे होत्या.

ग्रामजोशी मात्र जुन्या ग्रामव्यवस्थेतील एक धार्मिक अधिकारी होता. पंचांग सांगणे, लग्न लावणे, अंत्यसंस्काराचे पौरोहित्य करणे आणि प्रसंगोपात उपाध्येपण करणे हा ग्रामजोशीचा अधिकार असे. त्याच्याकडे ग्रामदेवतेची पूजा-अर्चा, नैवेद्य आणि शकुन-अपशकुन पहाणे ही कामे असत. तो जातीने ब्राम्हण असे आणि कुणब्‍याकडून धान्याचा शेकडा एक या प्रमाणात त्याला पेंढ्या मिळत. याशिवाय नैमित्तिक शिधा व दक्षिणा वेगळी असे. गिडबिडकी जोशी हे प्रामुख्याने महाराष्ट्र−कर्नाटकांत आढळतात. ते डमरू वाजवून भिक्षा मागतात, म्हणून त्यांना गिडबिडकी किंवा कुडमुडे म्हणतात. यांच्या चालीरीती मराठ्यांप्रमाणेच असून ते पिंपळानामक पक्ष्याचा शब्द एकून भविष्य कथन करतात.

 

४३६. महार: गावचा आणखी एक महत्त्वाचा वतनदार म्हणजे महार. कोतवाल, जागल्या व येसकर ही गावकामे महारांकडे होती. गावच्या संरक्षणाची जबाबदारी महार आणि मांग अशा दोन्ही समाजाकडे होती. जागत्या, वेसकर इ. महारकीच्या कामाचे पोटविभाग असल्यामुळे अनेक ठिकाणी त्यावेळी ही सर्व कामे महार करीत असत आणि तिन्ही प्रतींचे बलुते घेत असत. महार जागले हे पाटील−कुलकर्ण्यांचे हरकामे शिपाई होते. सरकारी कामानिमित्त ज्या इसमाची त्यांना गरज लागते, त्याला बोलावणे, गावात कोणी परकीय मनुष्य आला, जनन, मरण किंवा गुन्हा झाला, सरकारी मालमत्ता, झाडे, हद्द निशाण्या यांत बिघाड झाला किंवा सरकारी जागेवर कोणी अतिक्रमण केले, तर त्याबद्दलची बातमी पाटील−कुलकर्ण्यांना देणे, गाव स्वच्छ ठेवणे, गस्त घालणे, पाटील-कुलकर्ण्यांबरोबर परगावाला सरकारी कामानिमित्त जाणे, गावचा वसूल, कागदपत्र व सरकारी सामान ठाण्यात किंवा परगावी पोहोचविणे, पलटणीचा बंदोबस्त, सरकारी अंमलदारांचा सरबराई, गाड्या धरणे वगैरे कामांत पाटील-कुलकर्ण्यांना मदत करणे इ. कामे महार, जागले करीत असत. महार मुलकीकडील व जागले पोलीसकडील नोकर असल्याने वरील कामांपैकी जी मुलकी अंमलदारांकडून चालतात, ती महार करत व जी पोलीसांकडून चालतात, ती कामे जागले करीत असत. महारांना रोख मुशाहिरा मिळत नसे. बहुतेक गावी महारांना इनाम जमिनी आहेत, त्यांना ‘हाडकी हाडोळा’ म्हणतात.

गावात गुरे मरण पावली की महार, अशी मयत गुरे ढोरे त्‍यांना वतन म्‍रहणून दिलेल्‍या जमिनीत आणत, त्‍यांची कातडी इत्‍यादी काढल्‍यानंतर मयत गुरांची हाडे अनेक दिवस त्‍यांच्‍या जमिनीत पडून असत, अशा हाडांचा ढीग महार वतन जमिनीत अनेक दिवस पडून रहात म्‍हणून त्‍यांच्‍या जमिनीला ‘हाडकी’ जमीन किंवा ‘हाडोळा’ जमीन म्‍हणण्‍यात येत असावे.  

 ४३७. शेटे आणि महाजन: गाव वाढला म्‍हणून व्यापार वाढला आणि त्यातून गावात स्वतंत्र पेठ हा भाग निर्माण झाला. या पेठेची व्यवस्था लावण्याकरिता शेटे आणि महाजन हे वतनदार आले. त्यांच्याकडे बाजारपेठेशी निगडित सर्व व्यवस्था आली. या वतनाचा संबंध व्यापाराशी, प्रामुख्याने वाणी व्यवसायाशी, निगडीत असून गुजरात−महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आणि ग्रामव्यवस्थेतही त्यांचे स्थान महत्त्वाचे होते. इतर वतनांबरोबरच हे वतन वृद्धिंगत झाले. अर्थव्यवहाराचे नियमन करणारी संस्था म्हणून तिचे महत्त्व होते. व्यवहाराचे शिरस्ते ठरविणे, लवाद करणे, सरकार-दरबारी दाद मागणे इ. सर्व महत्त्वाचा कारभार महाजन चालवीत असे. व्यापारी व सावकार मिळून एकच महाजन संस्था असे. तिला ‘महाजनकी’ म्हणत. महाजनांच्या प्रमुखास नगरशेठ अशी संज्ञा होती.

 

४३८. देशमुख: गावातील पाटलाची पदोन्नती होऊन देशमुखी होत असे, ५-१० पाटलांवर देशमुख वतनदार होते. देशमुखांना पूर्वी सरपाटील किंवा देशपाटील म्हटले जात असे नंतर ते देशमुख झाले.

देश म्हणजे मुलुख आणि मुख म्हणजे प्रमुख अर्थातच त्याला ‘हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट’ म्हटले गेले. अनेक गावचा परगणा तयार व्हायचा. त्याचा अधिकारी म्हणजे देशमुख. अनेक देशमुखांच्या वरचा अधिकारी तो सरदेशमुख.

'देशमुख' हे छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासूनच्या काळातले, एक वरच्या दर्जाचे परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. ते त्यांच्या महाल किंवा परगणा नावाच्या महसुली विभागाचे मुख्य अधिकारी असत. अधिकार क्षेत्र वा परगण्याचे क्षेत्रफळाची व्याप्ती नुसार देशमुख ही पदवी वा देशमुखी हे वतन युरोपिअन घराणेशाही तील 'ड्युक'चे समकक्ष आहे.

'देशमुख' पदवी वा 'देशमुखी' हे वतन कोणत्याही एका विशिष्ट धर्म वा जातीचे संदर्भात नसून इतिहासकालीन हिंदू व मुस्लिम राजांनी, हिंदू मधील मराठा-कुणबी, ब्राह्मण यासह इतर जाती तसेच, मुस्लिम व जैन धर्मातील कुटुंबाना 'देशमुखी' बहाल केल्याचे दिसून येते. पण ९०% देशमुख कुणबी-मराठा जातीचे होते.

'देशमुखी' म्हणजे लष्करी, फौजदारी, महसुली व न्यायालयीन अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करीत होते तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करीत असत. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी, अमूक-एवढे सैन्य सरकाराला पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे, शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत.

'देशमुख' पदवी प्राप्त कुटुंबाकडे अधिकार क्षेत्रापासून महसूल प्राप्त करणे यासोबतच, अधिकार क्षेत्रात वा परगण्यात मूलभूत सेवा व सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी असे.

'देशमुख' हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेश विस्तारही करीत.

  छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशमुखांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले होते.

  शासकीय शेतसाऱ्यावर देशमुखांचा दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. कुठे कुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत.

ब्रिटिशांच्या राजवटीत देशमुखी संपली आणि देशमुख आणि सरदेशमुख हे शब्द फक्त आडनावांत राहिले. निजाम राज्यात मात्र १९४८ पर्यंत देशमुख वतने अस्तित्वात होती.

 

४३९. देशपांडे: देशपांडे हे नाव दोन शब्दांचे (देश आणि पांडे) मिश्रण आहे असे मानले जाते. 

देश म्हणजे देश किंवा प्रदेश किंवा गावांचा समूह. पांडे म्हणजे रेकॉर्ड किंवा हिशोब ठेवणारा. तर देशपांडे म्हणजे जो प्रदेश स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर खाते किंवा नोंदी ठेवतो.

 देशपांडे ही, ज्याची जमिनीच्या प्रदेशावर लेखापाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्‍या व्यक्तीला दिलेली ऐतिहासिक पदवी होती. परगाणा स्तरावर रेकॉर्ड ठेवण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांना दिलेली ही पदवी होती. परगण्यातील प्रशासकीय प्रमुखाला देशमुख म्हणत.गावपातळीवर त्यांच्‍या समकक्ष कुलकर्णी (लेखापाल) आणि पाटील (गावप्रमुख) होते. देशमुख यांच्या सहकार्याने देशपांडे, महसूल गोळा करणे आणि न्यायिक सभेत बसणे आणि जिल्हा स्तरावरील विविध नोंदी लिहिणे आणि ठेवणे यासाठी जबाबदार होते. कामासाठी साक्षरता ही अत्यावश्यक पात्रता असल्याने, कार्यालय सामान्यतः ब्राह्मणांसारख्या साक्षर वर्गाने व्यापलेले होते. देशमुख आणि देशपांडे यांच्याकडे वंशपरंपरागत जमिनी होत्या.देशपांडे यांच्यासाठी जमीन महसूल गोळा करण्याव्यतिरिक्त, गावातील कारभारावर पाटील, कुलकर्णी किंवा ग्राम लेखापाल, इतर गावचे अधिकारी आणि अग्रगण्य ग्रामस्थांच्या पंच किंवा परिषदेद्वारे नियंत्रण ठेवण्‍यात येत होते. 

देशपांडेच्या हाताखाली मोहरीर म्हणजे मदतनीस असायचा. देशमुख, देशपांडेच्या हक्कांना रुसूम आणि भिकणे म्हटले जायचे. यांना मदतीसाठी चिटणीस म्हणजे कारकून, स्टेनो ही विविध पदे निर्माण झाली. कर्नाटकात याला नाडगावुडा किंवा नाडकर्णी म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या वसुलीतून देशमुखांना २० टक्के तर पाटलांना १० टक्के वाटा असायचा त्याला ‘रूसूम’ म्हणत.

 

४४०. परगणा: दिल्‍ली सल्‍तनतने महसूल एकक म्हणून परगाणा सुरू केला होता. परगणामध्ये अनेक मौजे असतात, जे सर्वात लहान महसूल युनिट होते. ज्यामध्ये एक किंवा अधिक गावे आणि आसपासच्या ग्रामीण भागांचा समावेश होता.

शेरशाह सूरीच्‍या कारकीर्दीत, शिकदार (पोलीस प्रमुख), अमीन किंवा मुन्सिफ (महसूल मोजणारा आणि गोळा करणारा मध्यस्थ) आणि कारकुन (रेकॉर्ड कीपर) यासह इतर अधिकारी जोडून परगण्यांचे प्रशासन बळकट करण्‍यात आले.

सोळाव्या शतकात मुघल सम्राट अकबरने साम्राज्याचे सुभ्‍यांमध्‍ये (सुबहांमध्‍ये) जे राज्य किंवा प्रांताच्‍या समतुल्य होते, आयोजन केले, जे पुढे जिल्ह्यांच्या समतुल्य सरकारांमध्‍ये विभागले गेले, मुघल व्यवस्थेतपरगणा ही सरकारची स्थानिक प्रशासकीय एकके होती . वैयक्तिक परगण्यांनी जमिनीचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबाबत सामान्य प्रथा पाळल्या, ज्यांना परगणा दस्तूर म्हणून ओळखले जात असे, आणि प्रत्येक परगण्यामध्ये भाडे, फी, मजुरी आणि वजन व मापे यासंबंधीच्या स्वतःच्या रीतिरिवाज होत्या, ज्याला परगणा निरिख म्हणून ओळखले जाते.

परगणामध्ये अनेक तारफांचा समावेश होता , ज्यामध्ये अनेक गावे तसेच काही निर्जन डोंगर आणि जंगल जमीन होती.

बंगालपासून सुरुवात करून पूर्वीच्या मुघल प्रांतांमध्ये इंग्रजांचा विस्तार होत असताना, त्‍यांनी प्रथम परगणा प्रशासन कायम ठेवले, परंतु, चार्ल्‍स कॉर्नवॉलीस या गव्हर्नरने सन १७९३ चा कायमस्‍वरूपी समझोता लागू करून जमीनदारी पद्धतीच्या बाजूने परगणा व्यवस्था रद्द केली. जमीनदारांना ग्रामीण जमिनीचे पूर्ण मालक बनवले गेले आणि परगणा दस्तूर आणि परगणा निरिख रद्द केले. ब्रिटिश प्रशासनात जिल्‍ह्‍यांचा समावेश होता, जे तहसिल किंवा तालुक्‍यांमध्‍ये विभागले गेले.

परगणा हे भौगोलिक संज्ञा म्हणून महत्त्वाचे राहिले, जमिनीचे सर्वेक्षण, गाव ओळख आणि न्यायालयीन आदेशात टिकून राहिले. सन १९४७ मध्‍ये भारत आणि पाकिस्‍तानच्‍या स्वातंत्र्यानंतर परगणा जवळजवळ पूर्णपणे गायब झाला.

 

४४१. बलुतं:  बलुतं किंवा बलुते याचा शब्दशः अर्थ होतो धान्याचा वाटा. हा शब्द महाराष्ट्रातील बलुतेदार व्यवस्थेशी जोडलेला आहे. जुन्या काळात महाराष्ट्रात शेती व्यवसायाभोवती संपूर्ण  अर्थव्यवस्था चालत असे. यात शेतकरी हा धान्य पिकवायला जबाबदार असे, आणि विविध व्यवसाय करणारे बारा बलुतेदार असत. हे सर्व लोक आपल्या कामाच्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून धान्याचा वाटा घेत. म्हणून त्यांना बलुतेदार म्हणत.

 

४४२. बलुतेदार-अलुतेदार: गावोगावी बव्हंशी सेवाकार्ये करणारे जुने वतनदार म्हणजे अलुतेदार आणि बलुतेदार होत.

बलुतेदार हे प्रत्येक गावातील व्यवहाराकरिता व दैनंदिन व्यवहाराकरिता अपरिहार्य नसलेले वतनदार होते. पूर्वापार प्रत्येक गावास वंशपरंपरेच्या हुद्देदारांची संख्या २४ असे. त्यांपैकी बाराजणांना ‘अलुतेदार’ असे संबोधण्यात येई. पेशवाईअखेर या अलुते-बलुतेदारांची संख्या इतकी फोफावली की या २४ अलुते-बलुतेदारांच्या जोडीस तितक्याच लोकांची भर पडली व त्या सर्वांना वतनदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. प्रत्येक गावात हे सर्वच्या सर्व असतच असे नव्हे. प्रदेशपरत्वे त्यांच्या संख्येत फरक आढळतो. सुतार, लोहार, चांभार, न्हावी असे सतत ज्यांची गरज भासते, असे बलुतेदार बहुतेक गावात रहात असत तर तेली, तांबोळी, साळी, सनगर, माळी, गोंधळी असे नैमित्तिक अलुतेदार हे वाड्यांवर वस्ती करून रहात असत. अर्थात आपापल्या शेतीवाडीजळच राहणे सोयीचे असल्यामुळे मुख्य गावठाणाजवळ जमीन असलेले वतनदार गावठाणात रहात, तर लांबवर जमीन असलेले वतनदार रानात वस्ती करून रहात. हळूहळू त्यांच्या वस्तीच्या वाड्या बनत. काही अलुतेदार दरसाल ठराविक हंगामात एका गावाहून दुसऱ्या गावी येत-जात असत. यांपैकी गोंधळी, घडशी, घिसाडी हे प्रमुख होत.

दरसाल ठराविक हंगामात व्यवसायपरत्वे गावोगाव भटकणारे असे फिरस्तेही कालांतराने वतनदार बनलेले दिसतात. अशा वतनदारांत तीर्थोपाध्याय, डोंबारी, मांगगारूडी, दरवेशी, नंदीबैलवाले, कलावंत, कुडमुडे जोशी, वासुदेव इत्यादींचा अंतर्भाव होतो.

अलुते-बलुतेदारांस वर्षाकाठी सुगीच्या वेळी धान्यरूपाने अगर खळ्यावर पेंढ्यांच्या रूपाने ठराविक मोबदला मिळत असे. फिरस्ते मात्र प्रत्येक शेतकऱ्याकडून विकलेल्या मोबदल्यात किंवा हत्यारे-अवजारांची दुरूस्ती केल्यास, त्याचा मोबदला म्हणून किंवा केलेल्या खेळ-करमणुकीच्या किंवा सांस्कृतिक कार्यक्रमापोटी देणग्यांच्या ऐपतीस व वसूल करणाऱ्यांच्या ताकदीस अनुसरून धान्य अगर शेतातून पेंढ्या वसूल करीत. ते दरसाल नियमाने विशिष्ट हंगामात फिरू लागल्याने साहजिकच वहिवाटीनुसार ते वतनदार बनले आणि विशिष्ट कामापोटी गावकऱ्यांकडून मोबदला वसूल करणे हा आपला हक्क आहे असे ते मानू लागले.

भारतीय खेड्यांतील परंपरागत वतनी हक्क. हे हक्क ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया होत. खेड्यांत राहणाऱ्या बिगर-शेतकरी लोकांचा व्यवसाय हा परंपरेने चालत आल्यामुळे त्याला कुलपरंपरागत हक्काचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे व्यवसाय व त्यांना मिळणारा मोबदला हे प्रत्येक व्यावसायिकाचे वतनी हक्क झाले आहेत. हे वतनी हक्क ‘अलुते-बलुते’नावाने ओळखले जातात. या हक्कांवरून शेतकरी व त्यांवर उदरनिर्वाहाकरिता पूर्णपणे अवलंबून असणारे बिगर-शेतकरी लोक यांचे परस्परसंबंध वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसून येते. शेतकऱ्‍यांबरोबरच्या इतर लोकांच्या या परस्परसंबंधांना उत्तरेत जजमानी (यजमानी) पद्धत व महाराष्ट्रात ‘अलुतेदारी-बलुतेदारी’ म्हणतात. या जजमानी किंवा अलुतेदारी-बलुतेदारी पद्धतीत शेतकरी हा यजमान समजला जातो, तर बिगर-शेती-व्यावसायिक हे ‘कामिन’(इच्छुक) समजले जातात.

 

४४३. नारू-कारू: महाराष्ट्रात बिगर-शेती व्यावसायिकांचे अलुतेदार अगर ‘नारू’आणि बलुतेदार अगर ‘कारू’असे दोन प्रकार आढळतात. कारू हा शब्द ‘कार’ (करणारा) या शब्दापासून निर्माण झाला. ज्याची विद्या, कसब किंवा मेहनत, कुणबिकीला अथवा कुणब्याच्या सरकारी खासगी व्यवहाराला अवश्य असा धंदा करणारा तो कारू शेतकऱ्‍यांची अधिक महत्त्वाची कामे करणारे, त्यांच्या नित्याच्या गरजा भागविणारे ते बलुतेदार. साहजिकच त्यांना मोबदलाही अधिक मिळत असे. सामान्यपणे पाटील, कुलकर्णी हे सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने ‘बारा बलुतेदार’म्हणून प्रसिद्ध होते. ज्याच्या धंद्यावाचून कुणब्याचे काही अडत नाही किंवा क्वचित अडते, असा धंदा करणारा तो नारू. पण जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा भागवितात ते नारू म्‍हणजे अलुतेदार. यांमध्ये तेली, तांबोळी, साळी, सनगर, शिंपी, माळी, गोंधळी, डवऱ्या, भाट, ठाकर, गोसावी, मुलाणा, वाजंत्री, घडशी, कलावंत, तराळ, कोरव, भोई या अठरा जाती येतात. कारूला बलुतदार किंवा बलुत्या आणि नारूला आलुतदार किंवा आलुत्या म्हणतात. बळाने म्हणजे हक्काने उत्पन्न मागणारा तो बलुत्या, आणि आलेला आगंतुक म्हणून प्रेमाखातर किंवा धर्म म्हणून पसा मागणारा तो आलुत्या असेही या शब्दांचे मूळ असू शकेल.

 

४४४. बारा बलुतेदार: कुंभार, कोळी, गुरव, चांभार, मातंग, तेली, न्हावी, परीट, माळी, महार, लोहार, सुतार.

तेली हिंदू तर मुलाणा मुसलमान असत. बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यांत वेगवेगळी असू शकतात. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. ज्या गावात बलुतेदार नव्हते तेथे अलुतेदार हे बलुतेदाराचे काम करत असत.

मुस्लिम बलुतेदार: आत्तार, कुरेशी, छप्परबंद, तांबोळी, पिंजारी-नदाफ, फकीर, बागवान, मदारी, मन्यार, मोमीन, मिसगर, शिकलगार.

 

४४५. अठरा अलुतेदार: अलुतेदार हा अठरा जातींचा समूह आहे. यांचे महाराष्ट्रातील प्रमाण ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्ग (ओबीसी) मध्ये मोडतो. अलुतेदारांनाच ’नारू’ म्हणतात.

कासार, कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवर्‍या, तराळ, तांबोळी, तेली, भट, भोई, माळी, जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी.

या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.

 

४४६. सुबा: मुघल साम्राज्‍यातील प्रांत (राज्य) साठी सुबा हा शब्द होता. हा शब्‍द अरबी आणि पर्शियन भाषेतून आला आहे . कधीकधी त्याला ‘सुबेह’ देखील संबोधले जाते.  सुबहाचा गव्हर्नर/शासक हा सुभेदार म्हणून ओळखला जात असे, जे नंतर भारतीय  आणि पाकिस्‍तानी सैन्‍यातील अधिकाऱ्याचा संदर्भ देण्यासाठी सुभेदार बनले. बादशाह (सम्राट) अकबरने सन १५७२-१५८० च्या प्रशासकीय सुधारणां दरम्यान सुबहांची स्थापना केली होती. सुरुवातीला त्यांची संख्या १२ होती, परंतु त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस सुबांची संख्या १५ पर्यंत वाढली. पुढे सुबांची सरकारांमध्‍ये (प्रशासकीय विभागांमध्‍ये) किंवा जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आली. सरकारांची पुढे परगाणा किंवा महालांमध्‍ये विभागणी करण्यात आली. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस जसे साम्राज्य विरघळण्यास सुरुवात झाली, तसतसे अनेक सुबाहे स्वतंत्र झाले.

 ४४७. सिकदार: सिकदार किंवा शिकदार हे भारतीय आणि बांगलादेशी आडनाव आहे. सिकदार म्हणजे एक सिक्की (एक चतुर्थांश) जमिनीचा मालक. ही पदवी ब्रिटिश सरकारने दिली होती. सिकदार हे बंगाली ब्राह्मण आहेत (पूर्वीचे आडनाव भट्टाचार्य), त्‍यांना ब्रिटिशांनी सिकदार ही पदवी दिली होती. ते बांगलादेशातील सिल्हेट प्रदेशातील जमीनदार होते.

 ४४८. शिकमिदार: पट्‍टेदारासह जमिनीवर ताबा असणारी व्‍यक्‍ती

                                                                (तेलंगाना जमीन महसूल कायदा, १३१७-फसली)

 ४४९. शिकलगार (Saikalgar):  चाकू, तलवार बनवणे, साफ करणे आणि तलवारीची म्यान बनवणे अशी कामे करणारी जमात.

 ४५०. साळी (Salis): म्‍हणजे विणकाम करणारे विणकर

 ४५१. पटवेकर (Patvekars): रेशीम किंवा सुती धागे कातणारे. (spin the silk or cotton threads)

 ४५२. घिसाडी (blacksmiths): प्रवासी लोहार जमात. यांना तरिमुक (Tarimuk) असेही म्हणतात आणि ते त्‍यांच्‍या गाढवांसोबत गावोगाव फिरतात.

 ४५३. कचारी (Kacharis): हे लोक काचेच्या बांगड्या बनवून त्‍यांना लाख किंवा सीलिंग मेण (sealing wax) आणि रंगीत काचेने झाकतात.

 ४५४. कासार (Kasars): कासार, काचेच्या बांगड्या बनवून विकतात आणि यातील काही पितळ आणि तांब्याची भांडी बनवून विकतात.  पितळ आणि तांब्याचे भांडे बनवणार्‍यांना तांबटगर (Tamba- tagars) म्हणतात.

 ४५५. मनसब: पूर्वीच्‍या काळी पगार देण्‍याची पध्‍दत नसल्‍यामुळे, राजा त्‍याच्‍या सैनिकांच्‍या प्रमुखाला कसायला जी जमीन देत असे त्‍याला जहागिरी म्‍हणत. अशा जहागिरदाराला अनेक गावांचा जमीन महसूल वसूल करण्‍याचा अधिकार असे. या जहागिरीच्‍या उपभोगासाठी दिलेले अधिकार म्‍हणजे मनसब.

 ४५६. खेडे: खेडणे म्‍हणजे जमीन कसणे आणि खेडूत म्‍हणजे जमीन कसणारी व्‍यक्‍ती. यावरून खेडुतांची वस्‍ती ते खेडे. खेड्‍यामध्‍ये प्रमुख काम म्‍हणजे शेती सबब शेती करणार्‍या व्‍यक्‍तींचे म्‍हणजेच शेतकर्‍यांचे गाव म्‍हणजे खेडे.

 ४५७. पडे: नैसर्गिकरित्‍या मृत झालेले जनावर. अशा जनावराचे मांस खाणार्‍या जाती त्‍याला ‘भाजी’ तर ते न खाणार्‍या जाती त्‍याला ‘माती’ असे म्‍हणत.

 ४५८. पालं: फिरस्‍त्‍या समाजाच्‍या लोकांनी गावाबाहेर तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात उभारलेल्‍या झोपड्‍या.

 ४५९. आळी: समान जाती-जमातीच्‍या लोकांची सलग ओळीत बांधलेली घरे. उदा. सुतार आळी, माळी आळी.

 ४६०. तनखा: राजा तोरडमलने सर्व प्रांतातील 'जमिनीचे वर्गीकरण आणि वसूल आकारणी केली. या वसूलपद्धतीस 'असल-इ-जमा- इ-तुमार' किंवा 'तनखा' असे म्‍हणतात. पूर्वी चलन म्‍हणून तांब्याचा टक्का (नाणे) प्रचलीत होते. त्याऐवजी चांदीचे 'तनखा' नावाचे नाणे चलन म्‍हणून सुरू केले गेले म्हणून या पद्धतीचे नाव 'तनखा' असे पडले.

 ४६१. जमीनदारी पध्दत: सर्वप्रथम बंगाल, बिहार व ओरीसा (ओडिशा) प्रांतात ही सुरु केली.यानुसार  शेतकऱ्यांवर लावण्यात येणाऱ्या महसुलाची रक्कम ठरविण्यात आली. जमिनदाराने ही रक्कम शेतकऱ्यांकडुन जमा करुन वेळीच सरकारी खजिन्यात जमा करणे. भारताच्या 19% भागात ही पध्दत होती.

 ४६२. महालवारी पद्धत: महालवारी पद्धत ही जमीनदारी पद्धतीची सुधारित आवृत्ती होती. त्यात रयतवारी पद्धत आणि जमीनदारी पद्धती या दोन्ही प्रकारच्या तरतुदी होत्या. या पद्धतीमध्‍ये संपूर्ण गावाच्या वतीने गाव नेत्‍यांना (गाव प्रमुख) शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्याचा अधिकार देण्‍यात आला होता.

लॉर्ड विल्यम बेंटिकने सन १८३३ मध्‍ये भारतातील मध्य प्रांत, वायव्य सरहद्द, आग्रा, पंजाब, गंगा व्हॅली इत्यादि ठिकाणी जमीन महसूलाची महालवारी पद्धत सुरू केली. महालवारी हा शब्द ‘महल’ या हिंदी शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ गावांच्या समूहापासून बनलेला समुदाय असा आहे. महालवारी पध्‍दतीमध्ये जमीनदार किंवा लंबरदार (ज्यांना नंबरदार असेही म्हणतात) यांचा समावेश होतो. खेड्यातील समुदायांबरोबरच जमीनदारही कर भरण्यासाठी संयुक्तपणे जबाबदार होते. महालवारी पद्धतीमध्‍ये महसुलात वेळोवेळी सुधारणा होत असे.

 ४६३. रयतवारी पद्धत: ज्‍या पध्‍दतीत सरकार आणि जमीन धारण करणारे रयत यांच्यात थेट संबंध प्रस्थापित केला जातो त्‍याला रयतवारी पध्‍दत म्हणतात. या पध्‍दतीत रयतेकडून जमीन महसूल गोळा करून सरकारला भरणारा मध्यस्थ किंवा दलाल नसतो.

रयतवारी पद्धतीत शेतकरी किंवा शेती करणारे हे जमिनीचे मालक मानले जात होते. त्यांच्याकडे जमिनीचे मालकी हक्क होते, ते जमीन विकू शकत होते, गहाण ठेवू शकत होते किंवा भेट देऊ शकत होते. सरकार थेट शेतकऱ्यांकडून कर वसूल करत असे.
रयतवारी पद्धत प्रथम थॉमस मुनरो यांनी सन १७९२ च्‍या सुमारास मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये सुरू केली. लॉर्ड हेस्टिंग्ज हे गव्हर्नर-जनरल होते तेव्हा सन १८१३ ते १८२३ या कालावधीत त्‍यांनी रयतवारी पध्‍दत सुरू केली.

 

४६४. 'गावगाडा': वतनदारांच्या गावसंबंधाच्या परस्पर व्यवहाराला आणि वतनदारांच्या जगद्‍व्‍यापी जाळ्यात गुरफटलेल्या गावच्या समाईक अंतर्बाह्य व्यवहाराला 'गावकी' किंवा 'गावगाडा' असे म्हणतात.

 ४६५. सनदी इनाम आणि गावनिसबत: इनाम देण्‍याचा अधिकार असणारे दोन म्‍हणजे गाव आणि राव. भूमीचे स्वामी राजे होते, तरी गावांनाही जरुरीप्रमाणे इनाम देण्याची ऐपत व मुभा होती. सबब इनामाचे दोन भाग पडतात - सनदी आणि गावनिसबत. राजाने दिलेल्या इनामांना सनदी म्हणतात व गावजमिनींतून किंवा गावच्या उदिमावर अगर प्राप्तीवर गावाने दिलेल्या इनामांना गावनिसबत इनाम म्हणतात.

४६६. नोकर-इनामांचे प्रकार : (१) सरकारच्या लष्करी किंवा मुलकी नोकरीच्या शर्तीवर दिलेले ‘जागीर’, ‘फौजसरंजाम’, अगर ‘जातसरंजाम’ ह्यासारखे इनाम ('जा' किंवा 'जै' म्हणजे जागा, नेमणूक 'गिर' म्हणजे प्राप्त होणे). 'सरंजाम' म्हणजे सामग्री, सामान. मुसलमानांनी दिलेल्या इनामांना ‘जागीर’ अथवा ‘जहागीर’ व मराठ्यांनी दिलेल्या इनामांना ‘सरंजाम’ म्हणत.

(२) देऊळ, समाधी, मशीद, दर्गा वगैरेमधील पूजा-अर्चा, दिवाबत्ती, झाडसारवण, उत्सव, यात्रा, उरूस, हमागे ह्यासारखे समारंभ, इत्यादी चालविण्यासाठी दिलेले ‘धर्मादाय’ किंवा ‘देवस्थान’ इनाम (३) गाव, महाल, परगण्याची महसुली फौजदारीसंबंधाने गावकी व घरकी कामे करणाऱ्या गावकामगारांना व परगणे अमलदारांना दिलेले इनाम.

 इनाम म्हणून जे काही देण्यात आले ते काळीचे उत्पन्न - स्वामित्व नव्हे - म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार, किंवा इनाम जमीन धारण करणाऱ्यांना महसुलाची सर्वस्वी अगर अंशत: सूट देण्यात आली.

इनाम मिळकती दोन प्रकारच्या होत्‍या. ‘प्रत्यक्ष’ किंवा ‘दुमाला’ आणि ‘अप्रत्यक्ष’ किंवा ‘परभारा’. पहिल्या प्रकारात इनामदाराना सबंध महाल, गाव किंवा गावातील काही जमीन दुमाला करून देत व धारा वसूल करण्याचा राजाधिकारही त्यांना असे. दुसऱ्या प्रकारचे इनाम नक्त किंवा ऐनजिनसी असत. धारा वसूल करून आपल्या खजिन्यातून सरकार इनामदारांना जी ठराविक रक्‍कम रोखीने अदा करी तिला ‘नक्त इनाम’ म्हणत आणि जमीन धारण करणाऱ्याकडून इनामदार परस्पर ठराविक ‘घुगरी’ म्हणजे दर बिघ्यास किंवा नांगरास धान्याची अमुक मापे घेत ती, अथवा बाजारहाटांत किंवा वाणगी घेत ती, ह्यांना ‘परभार हक्क’ किंवा ‘ऐनजिनसी इनाम’ म्हणत.

 

४६७. मोकदम: मोकदम (मुकादम) म्‍हणजे प्रमुख इसम. हा किताब पाटलाला आहे. पाटील- चौगुल्याखेरीज सोनार, शेटे, सुतार, माळी, कुंभार, परीट, तेली, मठपती वगैरे स्पृश्य जातींच्या वतनदारांना 'बाजेवतनदार' (बाज म्हणजे संपादन केलेला, गुणी) म्हणत; परंतु साधारणतः गावचे सगळे श्रेष्ठ वतनदार 'गाव-मुकादम' ह्या नावाखाली मोडत.

 ४६८. वतनाचे तीन वर्ग: इंग्रज सरकारने उपयोगाच्या दृष्टीने वतनांचे तीन वर्ग केले.

(अ) सरकार उपयोगी, (ब) रयत उपयोगी (क) सरकार व रयत ह्या दोघांनाही निरुपयोगी.

(अ) सरकार उपयोगी वतनदार- पाटील, राव, खोत, गावडा, गावकर, नाईक, शेटी, मुकादम, ग्राममनसुबो, मुखी, मत्तादार, वाडेरो, कुलकर्णी, पांड्या, पटवारी, निसुंदा, तलाठी, कर्णिक, शानभोग, ग्राममिरासीदार, पट्टामणी, करणम्, तापेदार, महार, धेड, वेसकर, कारभारी, वल्हेर, मांदगेरू, तराळ, जागल्या, चौगुला, कोळी, भील, रामोशी, मांग, हवालदार, जमादार, नाईकवाडी, रखवालदार, पगी, शेतसनदी, कोतवाल, गस्ती, तळवार, अंबीकार, कोलेगार, मधवी, कोरभू, गडकरी, तशदार, शिपाई, वालीकर, बारकेर इत्यादी.

(ब) रयत उपयोगी वतनदार- जोशी, गुरव, जंगम, जैनोपाध्याय, काजी, मुलाना, खतीब, मुजावर, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, आंबेकरी, हळकरी इत्यादी.

(क) ज्यांच्या चाकरी सरकारला व रयतेला अनिवार्य नाही असे वतनदार- पोतदार (सोनार), शेकदार, महाजन, दलाल, शेटे, घाटपांडे, निरखदार, चौधरी, डांगे, दानगट, औटी, मुसरीफ, पथकी, पखाली, जिनगर, मेंढगार, थळेकरी, बेलदार, शिकलदार, नावाडी, न्हावी, तांबोळी, परीट, शिंपी, तेली, माळी, गवंडी, कासार, पिंजारी, भाट, ठाकूर, वाजंत्री, घडशी, जोगी, भुत्या, गोसावी, बैरागी, पुजारी, वाघ्या, मुरळी, जोगतिणी, हिजडे, मुंढ्या, डवऱ्या, भराडी, गोंधळी, भगत, दुगरी, पोतराज, फकीर, भोई, वाटाडे, पानडे, गारपगार, डोलीवाले, कलावंतीण, पाट साफ करणारे इत्यादी.

 

४६९. खोती: खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत. खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार, वतनदार असाही होतो.

खोती पद्धतीमुळे कोकणातील शेतकरी पिढ्यांपिढ्या गांजले होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा खोतांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. खोताचे हक्क हे वंशपरंपरागत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट करण्‍यात आले.

 

४७०. डोल: दुष्‍काळात सरकारतर्फे महार-जागल्‍यांना देण्‍यात येणारी रोकड किंवा धान्‍य (खावटी)

 ४७१. मुलगेणीदार- मुलीदार: कन्‍नड भाषेत मुलगेणीदार म्‍हणजे कूळ आणि मुलीदार म्हणजे जमीन मालक.

 ४७२. ‘फसली वर्ष: निजाम काळातील इसवी सन (वर्ष). फसली कॅलेंडर अकबराच्‍या राज्यरोहणाच्या वर्षापासून आहे  हे कापणी आधारीत (harvest-based) कॅलेंडर आहे. याचा आरंभ मृग नक्षत्रापासून होतो.  फसली वर्ष म्हणजे जुलै ते जून असा १२ महिन्यांचा कालावधी. फासली वर्षात ५९० जोडल्यास ग्रेगोरियन कॅलेंडर मिळते. (हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्‍ट करणे कायदा १९५४)

 

४७३. सत्ताप्रकार: मिळकत पत्रिका (Property Card) वर नमूद राज्यस्तरीय विविध सत्ताप्रकार:

- गावठाणतील सारामाफीने ठरविलेल्या मिळकती (परंपरागत रुढीनुसार)

अ-१ - गावठाणातील परडी जमीन

- सरकारी मालकीच्या भाडयाने दिलेल्या व भाडे भरण्यास पात्र असलेल्या मिळकती

ब-१ - कब्जेहक्काची रक्कम वसूल करुन अटी व शर्तीवर दिलेली शासनाची मिळकत.

ब-२ -  नगर पालिकेने सार्वजनिक कामासाठी धारण केलेल्या फायदेशीर कारणासाठी धारण केलेल्‍या किंवा सार्वजनिक, शैक्षणिक, धार्मिक, धर्मादाय संस्थाना दिलेल्या सरकारी मिळकती.

ब-३ - सारामाफीने / बिन फाळयाने धारण जमिनी.

ब-४ - फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासिताच्या वसाहतीसाठी शर्तीवर देण्यात आलेल्या जमिनी.

क - बिनशेतीसारा अदा करण्‍यास पात्र मिळकती.

- ग्रामपंचायत / जिल्हा परिषद/नगर परिषद / महानगरपालिका/स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरविलेल्या शर्तीने व वार्षिक भाडयाने दिलेल्या, सारा अदा करण्‍यास पात्र सरकारी मिळकती.

ड-१ - ग्रामपंचायत / जिल्हा परिषद/नगर परिषद / महानगरपालिका / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पूर्णपणे विकलेल्या परंतु सारा अदा करण्‍यास पात्र मिळकती.

- देवस्थान ईनाम / वक्फ बोर्डाच्या मिळकती / धर्मादाय आयुक्त / ट्रस्टच्या मिळकती (सार्वजनिक)/जात इनाम / धार्मिक, किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या मिळकती.

इ-१ - खाजगी देवस्थाने व मठाच्या खाजगी मालकीच्या मिळकती.

- ग्रामपंचायत / जिल्हा परिषद/नगर परिषद/ महानगरपालिका / स्थानिक स्वराज्य संस्था

यांच्या सार्वजनिक वापराच्या मिळकती.

- MHADA/सिडको/हडको/ विविध महामंडळे यांच्या मिळकती

ह-१ - MHADA/सिडको/हडको/ विविध महामंडळे यांनी भाडयाने दिलेल्या मिळकती.

- राज्य सरकार / महाराष्ट्र शासन यांच्‍या जमिनी.

ग-१ - केंद्र सरकारच्‍या जमिनी.

 ४७४. ‘तोडा ग्रास’: मध्यवर्ती राजसत्तेच्या कमकुवतपणामुळे, राजे, संस्थानीक व इनामदार, ह्यांच्या गृहकलहामुळे, आणि परस्परांबद्दलच्या साशंक व मत्सरी प्रवृत्तीमुळे, वेळोवेळी अनेक कपटी पुरुष रयतेकडून जमिनी, शेतमाल व पैसा लुटू लागले आणि त्यालाच ते हक्‍क म्हणू लागले. त्यांना आवरण्याचे सामर्थ्य गावगाड्यात नसल्याने व राजांनी त्यांच्याकडे कानाडोळा केल्याने ते शिरजोर झाले. सरकारकडून तर रयतेचे रक्षण होईना म्‍हणून गावांनीच त्यांना ‘तोडा ग्रास’ नावाची खंडणी (घासदाणा) देण्याचे ठरविले आणि त्यांनीही गावाला उपद्रव न देण्याचे व दुसरे कोणी लुटारू गावावर आल्यास त्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्‍वासन दिले. (Toda gras means the sum: paid to a powerful neighbour as the price of protection. Toda or Tora gras is composed of two words Toda or Tora and gras. The former means a compromise.)

 ४७५. गोत: सुमारे तेराशे वर्षांपासून दिवाणी, फौजदारी व्यवहारांचा निर्णय करणाऱ्या महाराष्ट्रीय संस्था गोत, देशक, न्यायाधीश व राजा ह्या होत्या. गोत म्हणजे गावातील निरनिराळ्या जातींच्या व व्‍यवसायिक लोकांची सभा. ती सर्व जातीच्या लोकांच्या गावकी स्वरूपाच्या वादाचा निवाडा करीत असे. पाटील वगैरे अधिकाऱ्यामार्फतच तिच्याकडे फिर्याद आली पाहिजे असा निर्बंध नसे. तिच्या निवाड्यास ‘थळपत्र’, ‘गोतपत्र’ किंवा ‘गोत-महजर’ म्हणत. गोताने दिलेल्या निवाड्याचा पुन्हा निर्णय करण्याचा व प्रांतिक स्वरूपाच्या व्यवहाराचा निर्णय करण्याचा अधिकार देशकास असे, आणि त्याच्या निवाड्यास देशकाचा किंवा ‘परगण्याचा महजर’ म्हणत. गोत व देशक यांच्यापेक्षा वरिष्ठ न्यायाधीश व राजा होते.

 ४७६. सतका-मतका: मांग जातीच्‍या लोकांना दर अमावस्‍येला घरा-घरातून मिळणारे उडदाची डाळ, राळे अगर इतर धान्‍य, पीठ, मीठ, मिरच्‍या, तेल इत्‍यादी पदार्थ. 

 ४७७. घाटा-हातधुलाई: महारांना, मृत जनावर ओढून नेण्‍यासाठी मेहेनताना म्‍हणून देण्‍यात येणारे धान्‍य. 

 ४७८. आघोड: मृत जनावराचे संपूर्ण कातडे. महारांकडून आघोड परत आल्‍यानंतर ते चांभाराला देऊन त्‍याचे जोडे, चाबूक इत्‍यादी बनवून घेत असत.

 ४७९. 'महसूल अधिकारी': (Revenue officer) म.ज.म.अ. च्‍या कोणत्याही तरतुदींन्वये नेमलेला आणि जमीन महसुलाच्या किंवा भूमापनाच्या, आकारणीच्या, हिशोबाच्या किंवा तत्संबंधी अभिलेखाच्या कामकाजात किंवा कामकाजांच्या संबंधाने नियुक्त केलेला कोणत्याही दर्जाचा प्रत्‍येक अधिकारी.

                                                                                                           [म.ज.म.अ. कलम २(३१)]

 ४८०. सूक्ष्‍म निरीक्षक (Micro Observer): सार्वत्रीक निवडणुकांदरम्‍यान संवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्‍म निरीक्षकांच्‍या नियुक्‍तीची तरतुद आहे. सूक्ष्‍म निरीक्षक हे केंद्र शासनाच्‍या कार्यालयातील किंवा केंद्र शासनाच्‍या सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतील अधिकारी असतात. ते त्‍यांचे अहवाल जोडपत्र ३१ मधील नमुन्‍यात फक्‍त निवडणूक आयोगाच्‍या निरीक्षकांकडे (Observer) सादर करतात.   

(निवडणूक आयोगाचे निर्देशपत्र क्र. ४६४/केटी-एलए-२००८ आणि ४६४/आयएनएसटी-इपीएस, दिनांक २४.१०.२००८)

 ४८१. वृक्ष अधिकारी (Tree Officer): महाराष्‍ट्र झाडे तोडण्‍याबाबत (विनियमन) (सुधारणा) नियम २००५ दिनांक १९.१२.२००५ अन्‍वये, "महाराष्‍ट्र झाडे तोडण्‍याबाबत (विनियमन) नियम १९६७" मध्‍ये 'महसूल अधिकारी' च्‍या ऐवजी 'वृक्ष अधिकारी' असे दाखल करणे तसेच वृक्षतोडीचे परवानगी विषयक अर्ज हे "वृक्ष अधिकारी" यांना उद्‍देशुन लिहिलेले असावे अशी सुधारणा करण्‍यात आली. सदर "वृक्ष अधिकारी" हा वनक्षेत्रपालाच्‍या दर्जाहून कमी नसेल असा अधिकारी असेल.

 ४८२. 'वादग्रस्त प्रकरणे निकालात काढणारा अधिकारी': सहायक महसूल अधिकारीच्‍या (अव्वल कारकुनाच्या) दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा महसुली किंवा भू-मापन अधिकारी. असा अधिकारी  विहीत मुदतीत अशी वादग्रस्‍त प्रकरणे निकालात काढील आणि अशा नोंदवहीत नोंद करण्यात आलेले आक्षेप ज्या आदेशान्वये निकालात काढण्यात आले असतील अशा आदेशांची असा अधिकारी याबाबत राज्य शासनाने केलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात येईल अशा रीतीने फेरफार नोंदवहीत नोंद करील. मंडल अधिकारी यांना या कलमान्‍वये वादग्रस्‍त नोंदींवर निकाल देण्‍याचा अधिकार प्राप्‍त आहे. [म.ज.म.अ. कलम १५०(४)]

 ४८३. 'प्रमाणन अधिकारी' (Certifying Officer): फेरफार नोंदवहीतील नोंदी तपासणारा आणि अशा नोंदी बरोबर असल्याचे आढळून आले तर किंवा, यथास्थिति, त्यात दुरुस्ती केल्यानंतर, विहित पध्‍दतीने त्‍या प्रमाणित करणारा सहायक महसूल अधिकारीच्‍या (अव्वल कारकुनाच्या) दर्जाहून कमी दर्जाचा नसेल असा महसूल अधिकारी किंवा भू-मापन अधिकारी. संबंधित पक्षकारांवर त्याबाबतीत नोटीस बजाविण्यात आल्याशिवाय अशा कोणत्‍याही नोंदी प्रमाणित करण्‍यात येत नाहीत. मंडल अधिकारी यांना या कलमान्‍वये फेरफार नोंदी प्रमाणित करण्‍याचा अधिकार प्राप्‍त आहे.                       [म.ज.म.अ. कलम १५०(६)]

४८४. कोतवाल (Kotwal): महाराष्ट्रातील महसूल किंवा मुलकी प्रशासन व्यवस्थेतील सर्वात कनिष्ठ स्तरावर कार्यरत असलेला गावचा नोकर म्हणजे कोतवाल. कोतवाल हा चतुर्थ श्रेणीतील पूर्णवेळ काम करणारा गावाचा नोकर आहे. तो २४ तास आपल्या कामाशी बांधील असतो, त्याने पूर्णवेळ गावातच राहणे बंधनकारक असते. त्‍याची नेमणूक कोतवाल भरती, नियुक्‍ती आणि कार्ये याबाबत कोतवाल भरती व नेमणूक नियम, १९५९ अन्‍वये होते. जिल्‍हाधिकारी प्रत्‍येक गावाकरिता किंवा गावांच्या गटाकरिता एक किंवा अधिक कोतवाल नियुक्त करू शकतात.                                                 [म.ज.म.अ. कलम ()]

 ४८५. पोलीस पाटील (Police Patil ): ब्रिटिश काळात प्रथमच 'मुंबई ग्राम पोलीस अधिनियम, १८६७' अंमलात आणला गेला व त्‍यातील तरतुदीन्‍वये गाव पोलीसांचे अधिकार निश्‍चित करण्‍यात आले. या कायद्‍यानुसार पोलीस पाटील हे पद वंशपरंपरागत होते.

स्‍वातंत्रानंतर वंशपरंपरागत पदे रद्‍द केली गेली. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या स्‍थापनेनंतर 'महाराष्‍ट्र ग्राम पोलीस  अधिनियम, १९६७' अंमलात आला आणि पोलीस पाटील या पदाला शासकीय दर्जा देण्‍यात आला. पोलीस पाटीलांची नेमणूक 'महाराष्‍ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७' अन्‍वये होते.

 

४८६. विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer): जिल्ह्याचे पालक मंत्री आणि संपर्क मंत्री यांनी त्यांच्या जिल्ह्यासाठी प्रत्येक १००० मतदारांमागे एक या प्रमाणकानुसार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली जाते. पूर्वचारित्र्याबद्दलची पडताळणी करून जिल्हाधिकारी असे प्रस्‍ताव शासनाकडे पाठवतात. 

विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर दिनांकासहीत ‘साक्षांकनाचेच’ काम करतात. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करु नये. कागदपत्रांवर जर ‘सत्य प्रत’ म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाच्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/भत्ते अनुज्ञेय नाहीत. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर, कार्यालयावर स्वत:च्या नावासह ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये. ‘ओळख परेड’ तसेच ‘मृत्‍युपूर्व जबानी’, ‘उत्पन्नाचे प्रमाणपत्र’ देण्‍याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नाहीत.

नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम

करु नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.

विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्यात येणारी व्यक्ती ही किमान बारावी (एच.एस.सी.) किंवा ‘दहावी- बारावी (१०+२)’ हा शैक्षणिक पॅटर्न येण्यापूर्वीची जुनी एस. एस. सी. ( जुनी ११वी) उत्तीर्ण असावी. (शासन निर्णय, विकाअ २००७/४४०/प्र.क्र.१७४/२००७/५, दिनांक २५.७.२००७)

 

४८७. समेटकर्ता अधिकारी’ (Compromising Officer): एखाद्‍या समाजसेवी संघटनेचा, कायद्याचे उत्तम ज्ञान अलेला, एक किंवा अनेक क्षेत्रातील लोकसेवेचा अनुभव व सेवाभिलेख निर्दोष असलेली सावे वरिष्ठ पदाधिकारी.                       (ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याणासाठी नियम २०१०, नियम २).

 

४८८. निर्वाह अधिकारी (Maintenance Officer): जिल्हा समाज कल्याण अधिकारी (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण) अथवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी.

           [आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, कलम १८; १८(१)]

 ४८९. जबाबदारीचे पद (Responsible Position): शासनामधील किंवा सरकारी क्षेत्रातील संस्था किंवा परिसंस्था यामधील वेतनबँड पी.बी. - रु. ९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४०० किंवा त्यापेक्षा जास्त वेतनबँड व ग्रेड पे मधील राजपत्रित पद धारण करणारा. यामध्ये सदर वेतनबँड व ग्रेड पे मधील पदाशी समकक्ष पद देखील विचारात घेता येईल.

(२) खाजगी संस्थेतीलजबाबदारीचे पद' म्हणजे उच्च श्रेणीतील वरिष्ठ व्यवस्थापकीय पदांचा अनुभव हा जबाबदारीच्या पदावरील अनुभव.

 ४९०. अपील (Appeal): सक्षम अधिकार्‍याच्‍या कोणत्‍याही निर्णयाविरूध्‍द, महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, अनुसूची 'इ' च्या स्तंभ () मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या महसूल अधिकाऱ्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. गुणवत्ता (Merit) नसेल तरीही सर्व मुद्द्यांवर अपील करता येते. परंतु, कोणत्याही परिस्थितीमध्ये अपिलांची संख्या दोनपेक्षा जास्त होता कामा नये.

                                                     (महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २४७)

 ४९१. पुनरीक्षण (Revision): राज्यशासन व विवक्षित महसूल आणि भू-मापन अधिकारी यांचा, त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांचे अभिलेख व कार्यवाही मागविण्याचा व त्यांची तपासणी करण्याचा अधिकार म्‍हणजे पुनरीक्षण.

राज्यशासनास आणि त्या त्या विभागातील सहाय्यक जिल्हाधिकारी किंवा उप-जिल्हाधिकारी किंवा अधीक्षक, भूमि अभिलेख यांच्या दर्जाहून कमी दर्जाचा नाही अशा कोणत्याही महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्यास कोणत्याही निर्णयाच्या किंवा आदेशाच्या कायदेशीरपणाबद्दल किंवा औचित्याबद्दल आणि कोणत्याही दुय्यम महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्याने चालविलेल्या कार्यवाहीच्या नियमानुसारीतेबद्दल, स्वत:ची खात्री करून घेण्यासाठी अशा अधिकाऱ्याने चालविलेल्या कोणत्याही चौकशीचे किंवा कार्यवाहीची कागदपत्रे मागविता येतात व ती तपासता येतात. परंतु, (राज्यशासनाच्या पूर्व परवानगीने असेल ते खेरीज करून एरव्ही दुय्यम अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या किंवा आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर, कोणत्याही महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्याकडून पुनरीक्षण करता येत नाही.

तहसिलदार, नायब तहसिलदार आणि जिल्हा निरीक्षक, भूमि-अभिलेख यांना, ज्या प्रकरणी रीतसर किंवा संक्षिप्त चौकशी करण्यत आली नाही अशा कोणत्याही प्रकरणामध्ये त्याच्या हाताखालील कोणत्याही अधिकाऱ्याने केलेली कार्यवाही मागविता येईल व तपासता येईल.

कोणत्‍याही प्रकरणात कायदेशीरपणाची खात्री करण्यासाठी, निकाल पारित करतांना औचित्य भंग झाला असेल तर आणि कार्यपध्दतीबद्दल शंका असेल तर, या तीनच मुद्द्यांवर पुनरीक्षण करता येते.

                                                         (महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २)

 ४९२. पुनर्विलोकन (Review): राज्य शासन आणि प्रत्येक महसूल किंवा भू-मापन अधिकार्‍याला आपण होऊन किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही पक्षकाराच्या अर्जावरून आपण दिलेल्या किंवा आपल्या कोणत्याही पूर्वाधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे पुनर्विलोकन करता येते आणि त्यासंबंधात त्यास योग्य वाटेल असा आदेश देता येतो.

परंतु, आपण स्वत: न दिलल्‍या अशा कोणत्याही आदेशाचे लेखन प्रमादाच्या कारणाव्यतिरिक्त इतर कारणावरून पुनर्विलोकन करणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकाऱ्यास किंवा जमाबंदी अधिकाऱ्यास वाटेल तर तो प्रथम त्‍याच्‍या वरिष्‍ठ  अधिकार्‍याची मंजुरी घेईल आणि कोणत्याही आदेशात संबंधित पक्षकारास उपस्थित राहण्याबद्दल आणि त्या आदेशाच्या समर्थनार्थ आपले म्हणणे मांडण्याबद्दल नोटीस देण्यात आल्याशिवाय अशा कोणत्याही आदेशात बदल करणार नाही किंवा तो फिरवणार नाही.

पुढील कारणांखेरीज इतर कोणत्याही कारणावरून कोणत्याही आदेशाचे पुनर्विलोकन करण्यात येणार नाही.

(एक) नवीन आणि महत्त्वाच्या बाबींचा किंवा पुराव्याचा शोध,

(दोन) अभिलेख पाहताक्षणीच दिसून येणारी एखादी चूक किंवा दोष, किंवा

(तीन) इतर कोणतेही पुरेसे कारण.                  (महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २५८)

 

४९४. मनाई हुकू (Injunction): मनाई हुकूम हा एक कायदेशीर उपाय आहे जो एका पक्षाला विशिष्ट कृती किंवा वर्तन करण्यापासून रोखू इच्छित असलेल्या पक्षांसाठी उपलब्ध असतो. एखादी गोष्ट / कृती करण्यापासून एखाद्याला वंचित करणे किंवा वादातील एखादी कृती प्रतिबंधित करणे किंवा टाळणे, यासाठी मनाई हुकुमाची मागणी केली जाते. यासाठी पक्षकाराने हे दाखवून दिले पाहिजे की मनाई हुकूमाशिवाय त्‍याचे कधीही भरून न येणारे नुकसान होण्‍याची शक्‍यता आहे.

 ४९५. मनाई हुकूमाचे प्रकार (Types of injunction):

तात्पुरता मनाई हुकूम (Temporary injunction)- दाव्‍याचा अंतिम निर्णय येईपर्यंत यथास्थिती टिकवून ठेवण्यासाठी तात्पुरते मनाई हुकूम दिले जातात.  सहसा प्रकरणाच्या सुरूवातीस असे मनाई हुकूम मंजूर केले जातात आणि कायदेशीर कार्यवाहीच्या कालावधीपर्यंत कायम असतात.

कायमस्वरूपी मनाई हुकूम (Permanent injunction)न्‍यायालयाने दाव्‍यात अंतिम निर्णय दिल्यानंतर कायमस्वरूपी मनाई आदेश दिले जातात. ते प्रतिवादीला विशिष्ट क्रिया किंवा वर्तन सुरू ठेवण्यास प्रतिबंध करतात.

अनिवार्य मनाई हुकूम (Mandatory injunction) - अनिवार्य मनाई हुकूममध्ये प्रतिवादीने विशिष्ट कारवाई करणे आवश्यक असते.  

प्रतिबंधात्मक मनाई हुकूम (Preventive injunction) - प्रतिबंधात्मक मनाई हुकूम, प्रतिवादीला विशिष्ट कृती किंवा वर्तन करण्यास मनाई करतात. 

 ४९६. तक्रार नोंद (Disputed Entry): एखाद्‍या फेरफार नोंदीविरूध्‍द अन्‍य कोणत्‍याही व्‍यक्‍तीने आक्षेप दाखल केल्‍यास त्‍याची नोंद गाव नमुना सहा-अ मध्‍ये नोंदवली जाते त्‍याला तक्रार नोंद म्‍हणतात. फेरफार नोंदवहीतील नोंदी, अव्वल कारकुनाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल अशा महसूल अधिकारी किंवा भू-मापन अधिकारी यांना तपासता येतील आणि अशा नोंदी बरोबर असल्याचे आढळून आले तर किंवा, यथास्थिति, त्यात दुरुस्ती केल्यानंतर, विहित करण्यात येईल अशा रीतीने त्या प्रमाणित करण्‍यात येतील अशी कायदेशीर तरतूद आहे. या तरतुदीनुसार मंडलअधिकारी हे फेरफार नोंदी प्रमाणित करणारे तसेच तक्रार नोंदींवर निर्णय देणारे अधिकारी आहेत. [महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५० () आणि (६)]

 ४९७. 'सविस्‍तर किंवा रीतसर चौकशी' (Formal Inquiry): या चौकशीत वादी व प्रतिवादी, साक्षीदार यांचे लेखी म्‍हणणे मराठी मध्‍ये घेतले जाते, वादी व प्रतिवादी, साक्षीदार यांचे जबाब त्‍यांच्‍या स्‍वाक्षरीसह नोंदवून त्‍यांना वाचून दाखविले जातात, त्‍यांचे युक्‍तिवाद ऐकले किंवा स्‍वीकारले जातात, जर कोणताही पुरावा इंग्रजीमध्‍ये दिला जातो तेव्‍हा चौकशी करणारा अधिकारी म.ज.म.अ. कलम २३४(४) नुसार त्‍याचा मराठी मध्‍ये अनुवाद करतो, असा अनुवाद अभिलेखाचा भाग होतो. प्रत्‍येक जबाब समक्ष घेऊन त्‍याखाली चौकशी अधिकारी स्‍वतःची सही कतात आणि प्रकरणात सविस्‍तर कारणांसह लेखी निकाल देतात.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १६४ (फौ.प्र.सं. कलम १४५) अन्‍वयेची प्रकरणे, कुळ कायदा प्रकरणे, म.ज.म.अ. कलम २०(२), १३३, २१८ अन्‍वयेची प्रकरणे, म.ज.म.अ. कलम २४७ अन्‍वये प्रकरणे या प्रकरणात केलेली चौकशी 'सविस्‍तर किंवा रीतसर चौकशी' असते. कलम २३७ नुसार ही चौकशी ही भारतीय न्‍याय संहिता २०२३, कलमे २२९, २५७, २६७ (भा.द.वि. कलम १९३,२१९,२२८) च्‍या अर्थानुसार न्‍यायिक कार्यवाही समजली जाते आणि चौकशी करणार्‍या कोणत्‍याही प्राधिकार्‍याचे कार्यालय चौकशी कारणासाठी दिवाणी न्‍यायालय समजणेत येते.                                           [म.ज.म.अ. कलम २३४]

 

४९८. 'संक्षिप्‍त चौकशी' (Summary Inquiry): या चौकशीत वादी व प्रतिवादी यांचे लेखी म्‍हणणे मराठीमध्‍ये घेतले जाते, साक्षीदाराचे जबाब नोंदविले आणि त्‍यांना वाचून दाखविले जातात, त्‍यांचे युक्‍तिवाद ऐकले किंवा स्‍वीकारले जातात, या चौकशीत परिस्‍थिती, वस्‍तूस्‍थिती, पंचनामा इ. पुरावे महत्‍वाचे असतात. चौकशी अधिकारी प्रत्‍येक जबाब समक्ष घेतो आणि त्‍याखाली स्‍वतःची सही करतो. चौकशी अधिकार्‍यास योग्‍य वाटल्‍यास संक्षिप्‍त चौकशीचे रुपांतर रितसर चौकशीमध्‍ये केले जाऊ शकते.  

म.ज.म.अ. कलम १२४, २४२ अन्‍वयेची प्रकरणे, लेखन प्रमाद दुरुस्‍तीची म.ज.म.अ. कलम १५५ अन्‍वयेची प्रकरणे, हद्‍दीवरुन रस्‍त्‍याचा अधिकार देण्‍याची म.ज.म.अ. कलम १४३ अन्‍वयेची प्रकरणे, सीमा व चिन्‍हांच्‍या नुकसानाची म.ज.म.अ. कलम १४५ अन्‍वयेची प्रकरणे, पिक पाहणी प्रकरणे, कोर्ट वाटप दरखास्‍त प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १२६, १२८, १२९ (फौ. प्र. सं. कलम १०७, १०९, ११०) अन्‍वये चौकशीची प्रकरणे या प्रकरणात केलेली चौकशी संक्षिप्‍त चौकशी' असते. कलम २३७ नुसार संक्षिप्‍त चौकशी ही भारतीय न्‍याय संहिता २०२३, कलमे २२९, २५७, २६७ (भा.द.वि. कलमे १९३,२१९,२२८) च्‍या अर्थानुसार न्‍यायिक कार्यवाही समजली जाते आणि चौकशी करणार्‍या कोणत्‍याही प्राधिकार्‍याचे कार्यालय चौकशी कारणासाठी दिवाणी न्‍यायालय समजणेत येते.                      [म.ज.म.अ. कलम २३६]

४९९. 'सामान्‍य चौकशी' (Ordinary Inquiry): रीतसर व संक्षिप्‍त चौकशी करणे आवश्‍यक नाही अशी चौकशी म्‍हणजे सामान्‍य चौकशी. राज्‍य सरकार, वरिष्‍ठ अधिकारी यांनी दिलेल्‍या आदेशांनुसार, नियमांना आधिन राहून अशी चौकशी केली जाते. चौकशी अधिकार्‍यास योग्‍य वाटत असेल तर सामान्‍य चौकशीचे रुपांतर, रीतसर चौकशी मध्‍ये करु शकतात व ते स्‍वेच्‍छाधिन आणि कायदेशीर आहे.

रेशनकार्ड विभक्‍त चौकशी, अनधिकृत बिनशेती चौकशी, अनधिकृत वाळू वाहतूक चौकशी, अतिक्रमण चौकशी, विशेष सहाय्‍य योजना प्रकरणे चौकशी, विटभट्‍टी प्रकरणे चौकशी या प्रकरणात केलेली चौकशी ‘सामान्‍य चौकशी' असते.                                                     [म.ज.म.अ. कलम २३८]

 

५०० 'प्रकरणे हस्‍तांतरीत करण्‍याचा अधिकार' : न्यायाच्या उद्देशांसाठी आदेश देणे इष्ट आहे असे जेव्हा राज्य शासनाला दिसून येईल तेव्हा त्यास कोणतेही विशिष्ट प्रकरण एका महसूल अधिकाऱ्याकडून काढून त्याच जिल्ह्यातील किंवा कोत्याही अन्य जिल्ह्यातील त्याच र्जाच्‍या किंवा वरिष्ठ र्जाच्‍या महसूल अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करण्याबद्दल निर्दे देता येतो.            [म.ज.म.अ. कलम २२५]

 ५०१. 'नोटीस बजावण्याची रीत': 'नोटीस 'बजावणे' म्‍हणजे संबंधीत व्यक्तीला नोटीस स्‍वाधीन करणे. जेव्‍हा एखाद्‍या व्यक्तीवर नोटीस बजावायची असेल तेव्‍हा सर्वसाधारणपणे पहिली नोटीस शक्यतो पोहोच देय डाकेने पाठवली जाते. पोहोच-देय नोंदणीकृत पोस्टाची पोहोच परत आल्यास नोटीस बजावली गेली असे गृहित धरले जाते. किंवा कोतवालामार्फत संबंधीत व्‍यक्‍तीवर समक्ष किंवा त्‍या व्‍यक्‍तीच्‍या विधी सल्‍लागारावर बजावून पोहोच घेता येते. या रीतीने नोटीस बजावता येत नसेल तर, त्या व्यक्तीच्या ज्ञात असलेल्या शेवटच्या राहण्याच्या पत्त्‍यावर किंवा ठिकाणी किंवा नोटीस ज्या जमिनीसंबंधात असेल ती जमीन ज्या गावामध्ये असेल किंवा ज्या गावात उक्त जमिनीची लागवड करण्यात येत असेल त्या जमिनीवर पंचनाम्‍याने डकवून तसेच त्‍या गावातील सार्वजनिक ठिकाणी नोटीसची प्रत चिकटवून बजावता येते. अशी कोणतीही नोटीस, त्यामध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावामध्ये किंवा पदनामामध्ये किंवा कोणत्याही जमिनीच्या वर्णनामध्ये कोणतीही चूक झाल्यामुळे, अशा चुकीमुळे वास्तविक अन्याय झाला नसेल तर, निरर्थक झाली आहे असे मानण्यात येणार नाही. काही प्रकरणात वर्तमानपत्रात प्रसिध्‍द करून नोटीस बजावता येते.       

                                                                                  [म.ज.म.अ. कलम २३०;३०२]

जेव्‍हा नोटीस "unclaimed" किंवा 'refused' म्‍हणून परत केली जाते, तेव्‍हा ती त्‍या पत्त्‍यावर रीतसर बजावली गेली असे मानले जाईल.

(मा. सर्वोच्‍च न्‍यायालय, हस्‍तांतरण याचिका (दिवाणी) क्रमांक २०९०/२०१९, प्रियांका कुमारी विरूध्‍द शैलेंद्र कुमार, दिनांक १३.१०.२०२३)

 

५०२. 'अपील दाखल करण्‍याची मुदत': जो निर्णय किंवा आदेश, जिल्हाधिकारी किंवा अधिक्षक, भूमि अभिलेख याच्या दर्जाहून कमी दर्जाच्या अधिकाऱ्याने दिला असेल तर, आदेशाची प्रमाणीत प्रत प्राप्‍त झाल्‍यानंतर साठ दिवसांच्‍या आत त्या निर्णय किंवा आदेशाविरूद्ध अपील दाखल करावे. उक्‍त अधिकार्‍यापेक्षा वरिष्‍ठ अधिकार्‍याच्‍या निर्णय किंवा आदेशाविरूद्ध नव्वद दिवसांच्‍या आत अपील दाखल करावे. उक्‍त मुदतीत अपील दाखल करण्यास अपिलार्थीजवळ पुरेसे कारण होते अशी अपिलीय अधिकाऱ्याची खात्री टवून देण्‍यात आली तर विहित केलेल्या मुदतीनंतर अपील दाखल करून घेता येईल.

जेव्हा अपील दाखल करण्‍याचा मुदतीचा शेवटचा दिवस रविवार किंवा राज्य शासनाने मान्य केलेल्या इतर सुट्टीचा दिवस असेल तेव्हा तेव्हा, ती सुट्टी संपल्यानंतर लगतचा पुढील दिवस अपील करण्यासाठी शेवटचा दिवस आहे असे समजण्यात येते.                                [म.ज.म.अ. कलम २५०; २५१; २५३]

 

५०३. 'अपिलास प्रतिबंधित आदेश':

() म.ज.म.अ. कलम २५१ अन्वये केलेले अपील किंवा पुनर्विलोकनासाठी केलेला अर्ज दाखल करून घेणाऱ्या आदेशाविरूध्‍द अपिल दाखल करता येत नाही;

(ब) पुनरीक्षणासाठी किंवा पुनर्विलोकनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळणार्‍या आदेशाविरूध्‍द अपिल दाखल करता येत नाही; 

(क) कार्यवाही स्थगित करण्यासाठी केलेला अर्ज फेटाळणार्‍या आदेशाविरूध्‍द अपील करता येणार नाही.                                                                                                 

                                                                                     [म.ज.म.अ. कलम २५२]

 

५०४. कॅव्हेट (caveat): याला मराठीत सावधानपत्र म्‍हणतात. जेव्हा एखाद्‍या व्यक्तीस असे वाटत असेल की, अन्‍य व्यक्ती किंवा संस्था आपल्याविरुद्ध न्यायालयात अर्ज/दावा दाखल करून काही एकतर्फी (ex parte) हुकूम मिळवू शकते, तेव्हा त्‍या व्‍यक्‍तीतर्फे सक्षम न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्‍यात येऊ शकते. किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या किंवा दाखल होणाऱ्या दाव्याची पूर्वसूचना देण्यात यावी, त्याशिवाय त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयाने कोणताही एकतर्फी हुकूम देऊ नये, याकरिता करण्यात आलेला अर्ज म्हणजे कॅव्हेट. ही न्यायालयाला देण्यात आलेली एक कायदेशीर नोटीस असते.

जी व्यक्ती कॅव्हेट दाखल करते तिला ‘कॅव्हेटर’ असे म्हणतात. कॅव्हेटचा मूळ उद्देश अर्जदाराच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण व्हावे असा आहे.  ‘कॅव्हेट’ हा मूळ लॅटिन शब्द असून याचा अर्थ,  न्यायालयाने दावा दाखल करून घेण्यापूर्वी किंवा त्याची सुनावणी करण्यापूर्वी नोटीस देण्याऱ्याचे म्हणणे ऐकून घ्यावे.

दिवाणी प्रक्रिया संहितेत कायदा आयोगाच्या शिफारशीनुसार सन १९७६ च्या दुरुस्तीनुसार १४८ (अ) हे नवीन कलम समाविष्ट करून कॅव्हेटची तरतूद करण्यात आली.

 कॅव्हेट हे दिवाणी/महसूल न्यायालय तसेच धर्मादाय आयुक्त यांचेकडे दाखल करता येते.

कॅव्हेट अर्जात अर्जदारास स्वतःचे नाव, पत्ता तसेच विरुद्ध पक्षकाराचे नाव व पत्ता लिहावे लागते. तसेच दाव्याविषयी थोडक्यात माहिती द्यावी लागते. कॅव्हेट अर्जाची एक प्रत विरुद्ध पक्षकारास नोंदणीकृत टपालाने पाठविणे बंधनकारक असते. कॅव्हेटचे स्वतंत्र नोंदणीपुस्तक प्रत्येक न्यायालयाच्या कार्यालयात ठेवले जाते. कॅव्हेट दाखल झाल्यावर कोणत्याही न्यायालयात दावा दाखल झाल्यावर न्यायालयास कॅव्हेटरला किंवा त्याच्या वकिलास नोटीस काढल्याशिवाय कोणताही एकतर्फा हुकूम पारित करता येत नाही. कॅव्हेटची मुदत कॅव्हेट दाखल झाल्याच्या तारखेपासून ९० दिवसांपर्यंतची असते. ९० दिवसांनंतर नवीन कॅव्हेट दाखल करावे लागते. अर्जदारास हुकूम होणेपूर्वी सुनावणीची संधी देणे, हा या कलमाचा मूळ उद्देश आहे.

                    [दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८, कलम १४८ (अ) व आदेश ४० (अ) नियम १ ते ७]

 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अथवा जमिन विषयक इतर कायद्याअंतर्गत मा. मंत्री (महसूल) यांच्या अर्धन्यायीक किंवा फेरतपासणी अर्ज/ अपिल प्रकरणात कॅव्हेट अर्ज दाखल करण्याबाबत असे स्पष्टीकरण देण्‍यात आले आहे की, विधी व न्याय विभागाचे स्पष्टीकरण  UOR to Revenue & Forest Dept. No. 537 / 108 / civil / confidential / A, दिनांक १५.१.२०१४ अन्वये,

‘‘दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८, कलम १४८-ए (१)अन्‍वये, एखाद्या खटल्याच्‍या किंवा सुनावणीच्या कार्यवाहीच्या वेळी कोर्टात हजर राहण्याचा हक्क सांगणारी कोणतीही व्यक्ती त्या संदर्भात कॅव्हेट दाखल करू शकते.

जर राज्य सरकारने अधिकृत राजपत्रात अधिसूचनेद्वारे तसे घोषित केले असेल तर दिवाणी प्रक्रिया संहिता, कलम ५ अन्‍वये, राज्य सरकार दिवाणी प्रक्रिया संहितेच्या काही तरतुदी महसूल न्यायालयांना लागू करू शकते किंवा काही तरतुदी महसूल न्यायालयांना लागू होणार नाहीत.

मा. मंत्री (महसूल) हे त्‍यांच्‍याकडे दाखल होणार्‍या अपील, पुनरीक्षण आणि पुनर्विलोकन प्रकरणात महसूल न्यायालय या क्षमतेत नव्‍हे तर अर्ध-न्यायिक प्राधिकरण या क्षमतेत सुनावणी घेतात. त्‍यामुळे मा. मंत्री (महसूल) यांच्यासमोरच्‍या कार्यवाहीला दिवाणी न्यायालयासमोरची कार्यवाही किंवा महसूल न्यायालयासमोरची कार्यवाही म्हणता येणार नाही. सबब, क्‍त संहितेच्या कलम १४८-ए अन्वये नमूद केल्यानुसार कॅव्हेटच्या तरतुदी मा. मंत्री (महसूल) यांच्यासमोरच्या कार्यवाहीसाठी लागू केल्या जाऊ शकत नाहीत’’

(महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, कार्यालयीन आदेश क्रमांकः संकिर्ण-०९/२०१३/प्र.क्र.४५१/ ज-१, दिनांक २६.३.२०१४)

 

५०५. लिस पेन्डन्स (Lis Pendens): लिस पेन्डन्स चा अर्थएखाद्‍या मिळकतीबद्‍दल दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित असणे.’ एखाद्‍या मिळकतीबद्‍दल दिवाणी न्‍यायालयात दावा चालू असेल तर अशा प्रलंबित दाव्यातील कारण (जमीन/मिळकत), दावा प्रलंबित असतांना त्रयस्थ पक्षाकडे तबदिल होऊन त्‍यामुळे गुंतागुंत वाढण्‍याची शक्‍यता असते. तसे होऊ नये म्‍हणून लिस पेन्डन्सची नोटीस देण्‍यात येते.

लिस पेन्डन्सच्‍या नोटीसची नोंदणी सब-रजिस्‍टारकडे करतांना दिवाणी न्‍यायालयाच्‍या स्‍वतंत्र हुकूमाची आवश्‍यकता नसते. ही नोटीस म्‍हणजे मालमत्तेबाबत दावा चालू आहे हे कळण्‍यासाठी असते. नोटीस ऑफ लिस पेन्डन्सची नोंदणी फी रु. १००/- आहे.         (मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५२)

 पूर्वी, नोटीस ऑफ लिस पेन्डन्सची नोंद सात-बारा उतार्‍यायावर इतर हक्‍कात स्‍वतंत्र फेरफाराने नोंदविण्‍यात येत होती. महसूल अधिकार अभिलेखात, सात-बाराच्‍या इतर हक्‍कात लिस पेन्डन्सची नोंद घ्‍यावी किंवा घेऊ नये याबाबत राज्‍याचे महाधिवक्‍ता यांचे अभिप्राय घेण्‍यात आले व चर्चेअंती असे दिसून आले की, महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४८ मधील तरतुदी व महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे व सुस्‍थितीत ठेवणे) नियम १९७१ अन्‍वये गाव नमुना सात-बारा उतार्‍यामध्‍ये कोणकोणत्‍या बाबींच्‍या नोंदी असाव्‍या याबाबत तपशील दिला असून त्‍यात लिस पेंडन्‍सच्‍या तरतुदीचा उल्‍लेख नाही. त्‍यामुळे लिस पेन्डन्सची नोंद सात-बारा उतार्‍यावर इतर हक्‍कात घेण्‍यात येऊ नये असे आदेश महाराष्‍ट्र शासनाने निर्गमित केले आहेत आणि या आदेशाची अंमलबजावणी सर्व जिल्‍हाधिकारी व क्षेत्रीय महसुली प्राधिकार्‍यांनी करावी अशा सूचना दिल्‍या आहेत.

           (महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक जमीन-२०१७/प्र.क्र.११५/ज-१ अ, दि.२१.९.२०१७) 

 सदर परिपत्रकाविरूध्‍द प्रमोद मोरेश्‍वर टट्‍टू आणि नारायण आत्‍माराम भोइर व इतर यांनी मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई येथे याचिका क्रमांक ७०४०/२०१३ आणि ८०४२/२०१४ दाखल करून सदर परिपत्रक रद्‍द करण्‍याची मागणी केली होती. सदर याचिकेचा निकाल देतांना मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांनी नमूद केले आहे की, एखाद्‍या दिवाणी न्‍यायालयात किंवा अर्धन्‍यायीक अधिकार्‍यासमोर फक्‍त दावा दाखल आहे या कारणावरून कोणताही हक्‍क किंवा अधिकार निर्माण होत नाही. तसेच अशा नोंदी महसूल अभिलेखात नोंदविण्‍याची तरतुद महसूल कायदे व नियमात नाही. त्‍यामुळे लिस पेन्डन्सची नोंद सात-बारा उतार्‍यावर इतर हक्‍कात न घेण्‍याचे महाराष्‍ट्र शासनाचे आदेश योग्‍य आहेत. 

सदर याचिका दिनांक १७ जुलै २०१८ रोजी मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांनी फेटाळली आहे आणि महाराष्‍ट्र शासनाचे उपरोक्‍त परिपत्रक रद्‍द करण्‍यास नकार दिला आहे.

 

५०६. ‘अज्ञान/अल्‍पवयीन (Minor): अशी व्यक्ती, जी व्यक्तिविधीनुसार अधीन असून जिला सज्ञानतेचे वय प्राप्त झालेले नाही;                                          [नोंदणी अधिनियम, १९०८, कलम २(८)]

वयाची १८ वर्षे पूर्ण न झालेली व्‍यक्‍ती.      (हिंदू अज्ञानत्‍व व पालकत्‍व कायदा १९५६, कलम ४.) 

न्यायालयाने पालक नेमला असल्यास सज्ञान होण्‍याचे वय २१ वर्षे ठरविले आहे. सज्ञान झाल्यावर प्रत्येक व्यक्ती विधिदृष्ट्या स्वयंपूर्ण होते व तिला आपले अधिकार उपभोगण्याची व बजावण्याची पात्रता मिळते. त्याचप्रमाणे तिच्यावर अनेक कर्तव्यांची जबाबदारी पडते. अज्ञानाला सर्वसाधारणपणे अशी पात्रताही नसते किंवा त्याच्यावर अशी जबाबदारीही नसते.

मुस्‍लिम कायद्‍यानुसार पुरूष व्‍यक्‍तीला १५ वर्षे वय पूर्ण झाल्‍यानंतर त्‍याला केवळ विवाह, तलाक. मेहेर यांसाठीच सज्ञान समजले जाते. इंडियन मेजॉरिटी ॲक्‍ट, १८७५ हा सर्वधर्मियांना लागू असल्‍याने मुस्‍लिम पुरूष व्‍यक्‍ती १८ वर्षे वयाचा झाल्‍यावर त्‍याला कायदेशीर दृष्‍टीने सज्ञान समजली जाते.

 

५०७. ज्येष्ठ नागरिक (Senior citizen):  वयाची वर्षे साठ पूर्ण केलेल्या अथवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि भारतीय नागरिक असलेल्या व्यक्ती.

              [आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, कलम २()]

 

५०८. ‘सुपर ज्येष्ठ नागरिक (Super Senior Citizen) सुपर सीनियर सिटीझन म्हणजे असा वैयक्तिक रहिवासी ज्याचे वय ८० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. (आयकर कायदा, १९६१ च्या कलम १९४-पी अन्‍वये ७५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर विवरणपत्र भरण्यापासून सूट प्रदान केल्या आहेत.)

 ५०९.मुले’ (Children): या संज्ञेत पुत्र, कन्या, नातू व नात यांचा समावेश होतो. यात अज्ञान व्यक्तीचा समावेश होत नाही. [आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, कलम २()]

 ५१०. आई-वडिल’ (Mother – Father): या संज्ञेत जन्म देणारे माता व पिता, दत्तक माता व पिता, सावत्र माता व पिता यांचा समावेश होतो, मग ते ज्येष्ठ नागरिक असो किंवा नसो.

                   [आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, कलम २()]

 ५११.नातेवाईक’ (Relatives): या संज्ञेत सज्ञान असलेला आणिआई-वडिल’ अथवा ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्‍युनंतर त्यांची मालमत्ता ज्याच्या ताब्यात येईल किंवा ज्याला कायदेशीर वारसाहक्क मिळेल अशा व्यक्तीचा समावेश होतो. [आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, कलम २()]

५१२. मृत्‍युपूर्व जबाब (Dying Declaration): मृत्यू समयी, मृत्युचे कारण सांगणारे निवेदन किंवा गंभीर जखमी झालेल्या आणि मृत्‍युच्या जवळ असलेल्या व्यक्तीने दिलेला तोंडी किंवा लेखी जबाब म्‍हणजे मृत्युपूर्व जबाब.  अशा स्थितीत असलेल्या व्यक्तीलाही आपला मृत्यू समीप असल्याची जाणीव असते. अशा जबाबामध्ये सामान्यत: त्‍या घटनेला किंवा दुखापतीस जबाबदार असणार्‍या व्यक्तीचे नाव किंवा वर्णन समाविष्ट असते. मयत व्यक्तीने मृत्यू समयी दिलेले, संबंधित वस्तुस्थितीचे विधान कायद्याच्या न्यायालयात एक संबंधित पुरावा बनते.

'मृत्यू शय्येवर असलेला कोणीही खोटे बोलत नाही' या संकल्‍पनेवर मृत्युपूर्व जबा नोंदवला जातो.

जर मृत्युपूर्व जबाब देणारी व्‍यक्‍ती अंतिमत: जीवंत राहिली, तर त्‍याचा जबाब भारतीय नागरिक सुरक्षा संहि. २०२३, कलम १८१ किंवा १८३ (फौ. प्र. सं. कलम १६२ किंवा १६४) अन्‍वये जबाब ठरेल आणि पीडित व्‍यक्‍ती आरोपीविरुद्ध साक्षीदार होऊन न्‍यायालयात  संपूर्ण हकीकत सांगू शकेल.

                             (भारतीय साक्ष अधिनियम २०२३ कलम २६/भारतीय  पुरावा कायदा, कलम ३२)

 ५१३. समन्‍स (Summons): एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकरणात चौकशीला सक्षम अधिकारी किंवा न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी देण्यात आलेली कायदेशीर सूचना म्हणजे समन्स. समन्स हे लिखित स्वरूपात,  कायदेशीर कलमे आणि हजर राहण्याची कारणे नमूद करून, कार्यालयाचा शिक्का व सक्षम अधिकाऱ्याच्‍या स्‍याक्षरीसह, दोन प्रतीत असते. समन्‍सची एक प्रत संबंधिताला बजावून, दुसर्‍या प्रतीवर त्‍याची स्‍वाक्षरी घेऊन ती प्रत जतन करण्यात येते.

महसुली प्रकरणात, पुरावा देण्यासाठी व दस्तऐवज सादर करण्यासाठी संबंधित व्‍यक्‍तीच्‍या नावे समन्‍स काढण्‍याचा कायदेशीर अधिकार अव्वल कारकुन यांनासुध्‍दा आहे.

(दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८, कलमे १३२ आणि १३३; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २२७, २२८)

 ५१४. वॉरंट (Warrant): एखादे कृत्य करण्यासाठी कायद्याने दिलेला लेखी अधिकार म्‍हणजे वॉरंट. हा शब्द सामान्यतः न्यायिक किंवा अर्ध-न्यायिक प्रकरणात लागू केला जातो, वॉरंट, जर एखादा इसम कायदेशीर सूचना किंवा समन्स बजावून ही न्यायालयासमोर किंवा सक्षम अधिकाऱ्यांसमोर हजर रहात नसेल, तर सक्षम अधिकारी किंवा न्यायाधीश, अशा इसमावर वॉरंट बजावून, त्याला अटक करून न्यायालय समोर हजर करावे, असे लेखी आदेश पोलीसांना देऊ शकतात.

जेव्हा जेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्‍वये कसूर करणार्‍यास किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस अटक करण्याबद्दल तरतूद करण्यात आली असेल तेव्हा अशा व्यक्तीस अटक करण्याबद्दल निर्देश देण्यास जो अधिकारी सक्षम असेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याने जारी केलेल्या वॉरंटावरून अशी अटक करण्यात येऊ शकते.                            (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २४०)

 

५१५. रेस ज्युडीकाटा (res judicata): पूर्वी केलेल्या दाव्यात एखाद्या मुद्‍द्‍याचा निर्णय झाला असेल तर तोच मुद्‍दा पुन्‍हा दुसऱ्या दाव्यात (Multiple Litigation for the Same Cause) निर्माण / उपस्थित करता येत नाही. रेस जुडी काटा’ ही संज्ञा कायदेशीरदृष्ट्या लागू करायची असेल, तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की, त्या संबंधित खटल्याचा अंतिम निकाल किंवा निर्णय पारित झालेला असावा. एखाद्या पक्षकाराच्या अनुपस्थितीमध्ये जर निकाल एकतर्फी दिला गेला असेल, तर ‘रेस जुडी काटा’ लागू होणार नाही. दोन्ही बाजूचे युक्तीवाद, साक्षीपुरावे होऊन दाव्‍याचा निकाल पारित झालेला असावा.

जर कनिष्‍ठ न्यायालयाने दिलेला निर्णय कोणत्‍याही कारणास्‍तव बेकादेशीर ठरवला गेला असेल; (न्यायालय दावा चालवायला सक्षम नसणे; न्यायालयीन कक्षा (ज्युरिडिक्शन) चुकलेली असणे) तर ‘रेस जुडी काटा’ लागू होणार नाही.                                                            (दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८, प्रकरण ११)

 

५१६. एक्सह्‍युमेशन (Exhumation): या इंग्रजी शब्‍दाचा अर्थ आहे, जमिनीखाली खोदून काहीतरी बाहेर काढणे (विशेषतः प्रेत) यालाच इंग्रजीमध्‍ये Disinterment of Bodies (the act of digging something out of the ground (especially a corpse where it has been buried असे म्‍हणतात.

Exhumation हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे. यातील 'Ex' चा अर्थ 'च्‍या बाहेर' (out of) आणि 'humus' चा अर्थ 'जमीन' (ground). अशा प्रकारे Exhumation चा शब्दशः अर्थ 'जमिनीच्‍या बाहेर काढणे' असा होतो. याचा अर्थ, मयत व्‍यक्‍तीच्‍या मृत्युचे कारण निश्‍चित करण्यासाठी किंवा काही इतर संबंधित तथ्यांवर निर्णय घेण्यासाठी, कायदेशीरपणे त्‍याचे मृत शरीर दफन भुमीतून खोदून शव पेटीच्‍या बाहेर काढणे. (authorized digging out the coffin of a dead person from his grave, in order to establish his cause of death, or to decide upon some other relevant fact.)

Exhumation हा शब्‍द तेव्‍हाच लागू होईल जेव्‍हा धार्मिक पध्‍दतीने, कायदेशीर रित्‍या मृत शरीराचा दफन विधी केला गेला असेल. ही जमिनीखाली दफन केलेले प्रेत खोदून बाहेर काढण्‍याची कायदेशीर प्रक्रिया आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १९४ (फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४) अन्‍वये संशयास्‍पद मृत्युचा तपास करणारे पोलीस अशा संशयास्पद मृत्युच्या चौकशीत मृत्‍युच्‍या कारणांचा सबळ पुरावा मिळाल्‍यास, एखादे पुरलेले प्रेत उत्‍खनन करून बाहेर काढण्‍यासाठी दंडाधिकार्‍याला विनंती करु शकतात.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १९६ (फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १७६) अन्‍वये Exhumation बाबत कायदेशीर तरतूद आहे. या कलमान्‍वये, ज्या मयत व्‍यक्‍तीचे आधीच दफन करण्‍यात आले आहे किंवा त्‍याला जमिनीखाली पुरण्यात आले आहे अशा कोणत्याही व्यक्तीच्या मृत्युचे कारण शोधून काढण्यासाठी त्याच्या मृतदेहाची तपासणी करणे जेव्हा दंडाधिकारी यांना समयोचित वाटेल तेव्हा असा मृतदेह जमिनीखालून उकरून काढण्यात लावण्‍याचा आणि त्याची तपासणी करवून घेण्‍याचा अधिकार दंडाधिकारी यांना आहे.

महसूल खात्‍यातील दंडाधिकारीय अधिकार असणारे अधिकारी या कलमान्‍वये कारवाई करू शकतात. यासाठी न्‍यायीक कामकाज करणार्‍या न्‍यायाधिशांच्‍या परवानगीची आवश्‍यकता नाही. कारण फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १७६ अन्‍वये करण्‍यात येणारी चौकशी ही एक दंडाधिकारीय चौकशी (magisterial inquiry) आहे. मुंबईमध्‍ये हा अधिकार अपघाती किंवा अनैसर्गिक वाटणार्‍या मृत्युची चौकशी करणार्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या विशेष अधिकार्‍यास (Coroner) यांना आहे.

 

५१७. दंडाधिकारीय चौकशी (Magisterial Enquiry): जेव्हा कोणताही मनुष्य पोलिसांच्या रखवालीत असतांना मरण पावेल किंवा पोलिसांनी केलेल्‍या गोळीबाराची परिणती इजा होण्यास किंवा जिवितहानी होण्यात झालेली असेल किंवा पोलिसांनी अटक केलेल्‍या आरोपींना सोडविण्याचा प्रयत्न करणार्‍या दंगेखोर जमावापासून स्वसंरक्षण करतांना पोलिसांनी गोळीबार केला असेल व त्‍यात जिवितहानी झाली असेल किंवा दरोडा घालणार्‍या किंवा रेल्‍वे बोगी लुटणार्‍या, जबरी चोरी करणार्‍या दरोडेखोरांवर पोलिसांनी गोळीबार केला असेल व त्‍यात जिवितहानी झाली असेल किंवा दंगेखोर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला असेल व त्‍यात जिवितहानी झाली असेल, इत्‍यादी कारणांसाठी जिल्‍हादंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍यामार्फत दंडाधिकारीय चौकशी करण्यात येते.

               (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १९६/फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १७६)

 

५१८. 'स्‍थगिती आदेश' (Stay order): एखाद्या नागरिकाचे हक्क सुरक्षित करण्यासाठी, भारतातील न्यायालय किंवा कायदेशीर प्राधिकरणांमार्फत होणारी कोणतीही न्यायिक कार्यवाही किंवा कोणतेही कार्य तात्पुरती थांबवणे (to stop the operation) किंवा पुढे ढकलणे.

 

५१९. 'जैसे थे आदेश' (Status quo): हा लॅटिन भाषेतील शब्‍द आहे. याचा अर्थ 'आहे त्‍या स्‍थितीत ठेवणे.' (let a thing be in its' existing condition) हा आदेश तात्‍पुरती स्‍थगिती ऐवजी (substitute to a temporary injunction) देण्‍यात येतो. ज्‍यामुळे दोन्‍ही पक्षांना वाद मिळकतीची स्‍थिती दाव्‍याच्‍या वेळेस आहे ती  तशीच ठेवणे आवश्‍यक असते. (where both the parties are supposed to maintain the status of disputed property in same condition as it is found on the suit date.)                       

 

५२०. अपॉस्टिल (Apostille): परदेशात स्‍थाईक खातेदाराला, परदेशातून जर एखादा सार्वजनिक दस्तऐवज, पुरावा म्‍हणून पाठवला असल्‍यास तो पॉस्टिल करून पाठविणे आवश्‍यक असते.  

परकीय देशातील अन्य कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक दस्तऐवज, मूळ लेखावरून अथवा त्याच्या कायदेशीर रक्षकाने प्रमाणित केलेल्या ज्या प्रतीसोबत, मूळ लेखाचा कायदेशीर ताबा ज्याच्याकडे असेल त्या अधिकार्‍याने आणि परदेशी देशाच्या कायद्यानुसार दस्तऐवजाच्या पुराव्यावर ती प्रत रीतसर प्रमाणित केलेली आहे असे लेख प्रमाणकाच्या किंवा भारतीय वाणिज्य दूताच्या किंवा राजनैतिक प्रतिनिधीच्या (an Indian Consul or diplomatic agent) मोहोरेने अंकित, असे प्रमाणपत्र.

हेग परिषद, १९६१ (Hague Convention) अंतर्गत, स्वाक्षरी करणार्‍या देशांनी जारी केलेले सार्वजनिक दस्तऐवज "अपॉस्टिल" म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रमाणीकरण प्रक्रियेने सादर केले जातात. एका देशात जारी केलेले सार्वजनिक दस्तऐवज दुसर्‍या देशामध्ये वैध म्हणून ओळखले जातील याची अपॉस्टिल खात्री देते.

(भारतीय साक्ष अधिनियम २०२३, कलम ७७ (फ)/ भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२ कलम ७८(६)]

 

५२१. महसूल मुद्रांक (Revenue Stamp): रूपये पाच हजार पेक्षा जास्‍त रोख रकमेच्‍या देवाण-घेवाणाच्‍या पावतीवर महसूल मुद्रांक लावण्‍याची तरतुद आहे. अशा व्‍यवहाराची पावती महसूल मुद्रांक शिवाय वैध मानली जाणार नाही. महसूल मुद्रांक सर्व टपाल कार्यालयात उपलब्ध आहेत.               

                                                                 [भारतीय मुद्रांक कायदा १८९९, कलम २(२३)]

 

५२२. पॅरोल आणि फर्लो रजा (Parole & Furlough Leave): शिक्षेदरम्यानही बंद्यांना कारागृहाबाहेर रजेवर येण्याची मुभा असते. शिक्षा भोगताना बंद्यांना ‘अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल’ व दुसरी ‘संचित रजा म्हणजे फर्लो’ रजेसाठी विनंती करण्याचा अधिकार असतो. या दोन्ही रजा केवळ पक्का बंदी म्हणजेच गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा लागलेल्या बंद्यांना लागू असतात.

  संचित (फर्लो) रजा- फर्लो रजा मिळणे हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. थोड्याथोड्या दिवसांनी कैद्याला आपल्या कुटुंबात रहावयास मिळावे आणि त्याचे सामाजिक संबंध स्थापित रहावे म्हणून ही रजा असते. फर्लो मिळण्यासाठी कैद्याला कोणतेही कारण द्यावे लागत नाही. फर्लोचा कालावधी ही शिक्षेतले सूट समजली जाते. या रजेचा कालावधी १५ दिवस असतो. कैद्याचे जवळचे नातेवाईक आजारी असतील, किंवा घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर कैदी संचित रजेसाठी अर्ज करू शकतो. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यावर, कैद्याचे तुरुंगातले वर्तन पाहून आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागवूनच ही रजा दिली जाते. फर्लो रजा मंजूर करण्‍याचे अधिकार पोलीस उप महानिरीक्षकांना आहेत कारागृहाचा अधिकारी १४ दिवसांची संचित रजा देऊ शकतो, तर संबंधित विभागीय आयुक्त ३० दिवसांपर्यंत संचित रजा देऊ शकतात. यात वाढही होऊ शकते. शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला वर्षातून १४-१४ अशा २८ दिवसांची ‘फर्लो’ रजा मंजूर करण्यात येते. कैद्याने ‘फर्लो’ रजा घेतल्यानंतर त्याला ‘पॅरोल’वर सुटता येते. मात्र, ‘पॅरोल’ घेतल्यानंतर किमान सहा महिने तरी त्याला ‘फर्लो’ रजा घेता येत नाही. 

  अभिवचन (पॅरोल) रजा- या रजेचा कालावधी एक महिन्याचा असतो. विनंतीवरून पॅरोल तीन महिन्यांपर्यंत वाढवता येते. जवळचे नातेवाईक मृत झाल्यास दहा दिवसांची पॅरोल कारागृह अधिक्षक मंजूर करू शकतात. या रजेचा कालावधी शिक्षेत गणला जात नाही. बंदी जितके दिवस रजेवर राहतो, तेवढे शिक्षेचे दिवस वाढतात. यादरम्यान त्याने गुन्हे केल्यास परत कोणतीच रजा मिळत नाही. पॅरोल रजा मंजूर करण्‍याचे अधिकार विभागीय आयुक्‍त (महसूल) यांना आहेत.

कारागृह प्रशासन बंद्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवला जातो, अर्जाचे गांभीर्य पाहून संबंधित बंदी ज्‍या जिल्ह्याचा रहिवासी असेल त्‍या जिल्‍ह्‍याच्‍या गुन्हे शाखेकडे अभिप्रायासाठी असा अर्ज पाठवला जातो. तेथे अर्जातल्या कारणाची शहानिशा केली जाते.

 

५२३. रिगर मॉर्टिस (Rigor Mortis): एखादी व्यक्ती किंवा प्राणी मरण पावल्यानंतर सुमारे चार  तासांनी त्‍याच्‍या मृत शरीराचे स्‍नायू, सांधे ताठ होतात आणि जागोजागी बंद होतात. या कडकपणाला रिगर मॉर्टिस म्हणतात . हा वाक्यांश लॅटिन आहे, रिगर चा अर्थ कडकपणा आणि मॉर्टिस म्हणजे मृत्यू. रिगर मॉर्टिस ही तात्पुरती स्थिती आहे. शरीराचे तापमान आणि इतर परिस्थितींवर अवलंबून , कठोर मॉर्टिस अंदाजे ७२ तास टिकते. 

 

५२४. नैसर्गिक न्यायतत्वे (Principles of Natural Justice): न्यायिक चौकशीत नैसर्गिक न्यायतत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नैसर्गिक न्याय तत्त्वांचे पालन करण्‍यात आले नाही तर राज्‍यघटनेच्या अनुच्छेद १४, १६, आणि ३११(२) मधील तरतुदींचा भंग होतो. नैसर्गिक न्यायतत्त्वांचे पालन करणे फक्‍त न्यायीक चौकशी करणार्‍या न्यायाधीशालाच बंधनकारक आहे असा काहींचा समज आहे तो सर्वथा चुकीचा आहे.

अर्ध न्‍यायीक काम करणारे अधिकारी, शिस्तभंगविषयक अधिकारी, चौकशी अधिकारी, अपील अधिकारी हे न्यायाधीशाचेच काम करीत असतात. प्रशासकीय चौकशी सुध्‍दा अर्ध न्‍यायीक कार्यपद्धती असते. त्यामुळे याबाबत नैसर्गिक न्यायतत्त्वांचे अनुपालन करणे आवश्यक ठरते.

राज्‍यघटनेच्या अनुच्छेद ३११ (२) नुसार नैसर्गिक न्यायतत्त्वांचा भंग करणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे ठरते. नैसर्गिक न्यायतत्वे ही कायदे व नियमांना पर्याय नाहीत तर ती कायदे आणि नियमांना पूरक आहेत.

नैसर्गिक न्‍यायतत्‍वांची प्रमुख तत्‍वे:

अ) कोणताही मनुष्य स्वत: च्या प्रकरणासाठी न्यायाधीश असणार नाही (No Man should be a judge in his own cause)

ब) कोणत्याही व्यक्तीला, त्याची बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय त्याला दोषी ठरविता येणार नाही. (No man should be condemned unheard)

क) सुनावणी घेतलेल्‍या व्‍यक्‍तीनेच निर्णय देणे (One who hears should decide)

 

५२५. कायदा (संकल्पना): शासनाने न्याय देतांना वापरलेली महत्त्वाची तत्त्वे म्हणजे कायदा होय. कायदा हा खरे तर नीती तत्त्वावर आधारित असतो. नीतीत्तत्वे मात्र त्या त्या समजात रुजलेल्या मुल्यांच्या आधारे ठरविली जातात. शासनाने लादलेले व शासनाकडून अंमलबजावणी होत असलेले वर्तणुकीचे नियम म्हणजे कायदा. कायदा हा सारासार विवेकबुद्धीचे आणि जनतेच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे.

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महसूल शब्दावली - 9. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

إرسال تعليق

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.